मुंबई - मागील अडीच महिने अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी बसने प्रवास करत होतो. मात्र, आता लोकल सुरू झाल्यानंतर बसच्या गर्दीतून त्यांची सुटका झाली असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी बळीराम लिगम यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेले लिगम यांनी आज (दि. 15 जून) पश्चिम रेल्वेने प्रवास केला. ही सेवा सुरू झाल्याचे अद्याप महापालिकेकडून सूचित करण्यात आलेले नाही. मात्र, आज सकाळपासून लोकल सुरु झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बोरिवली स्थानकातून लोकल पकडल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या ही मोठी असताना, त्यानुसार बसच्या फेऱ्या वाढत नव्हत्या. त्यामुळे गर्दी होऊन सोशल डिस्टनसिंग पाळताना अडचण होत होती. मात्र, आता लोकल सुरू झाल्याने निदान सोशल डिस्टनसिंग पाळणे शक्य होणार आहे, असे ते म्हणाले.
मागील अडीच महिने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा बंद होती. अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे लावून धरली होती. अखेर रविवारी (दि. 14 जून) रात्री उशिरा अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्याला रेल्वेने मान्यता दिली.