महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्ही वाढलेल्या गुणांची सूज कमी केली; घटलेल्या निकालावर तावडेंची अजब प्रतिक्रिया

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेचा निकाल १२ टक्‍क्‍यांनी घटला आहे. या निकालावर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे.

By

Published : Jun 8, 2019, 9:39 PM IST

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे

मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल १२ टक्‍क्‍यांनी घटला आहे. या निकालावर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, यापूर्वी देण्यात येत असलेले २० टक्के अंतर्गत गुण ही केवळ गुणाची सूज होती, आम्ही ती कमी केल्याने खरा निकाल लागला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले तो विद्यार्थी त्या पद्धतीचे करिअर निवडू शकतो, त्यातून त्या विद्यार्थ्याला चांगली संधी मिळू शकेल, असा दावाही तावडे यांनी केला आहे.

दहावीच्या निकालावर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे.

तावडे म्हणाले की, २००७ पर्यंत २० अंतर्गत गुण देण्याची पध्दत नव्हती. २००८ पासून अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण देण्याची पध्दत सुरू झाली. ही पध्दत २०१८ पर्यंत सुरू होती. गेल्या वर्षापासून ती थांबवण्यात आली. परंतु २००७ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देण्याची पध्दत नव्हती. त्यावेळी शालांत परीक्षेचा निकाल हा ७८ टक्के लागला होता आणि त्यानंतर जेव्हा ही पध्दत २००८ मध्ये सुरू झाली, त्यावेळी शालांत परीक्षेचा निकाल ८७.४१ टक्के इतका लागला. या निकालात २००७ च्या तुलनेत सुमारे ९ टक्के एकदम वाढ झाली. खऱ्या अर्थाने यंदा जो १२.३१ टक्के निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. तो कमी निकाल म्हणजे वाढलेल्या गुणांची सूज कमी झाली असल्याचे तावडेंनी म्हटले आहे.

या निकालामुळे निराश होण्याचे कारण नाही. दहावीच्या निकालामधून विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेची दिशा आता कळली असेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करा. मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. या फेर परीक्षेसाठी जर महिन्याभरात चांगला अभ्यास केला तर स्वाभाविकपणे फेर परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांना पुढील शिक्षण घेता येईल. अन्यथा विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रमाची व्यवस्थासुध्दा करण्यात आलेली असल्याचे तावडे यांनी विद्यार्थ्यांना सूचविले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर येत्या काळात तावडे यांच्यावर जोरदार टीका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details