मुंबई :मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवर या संसर्गजन्य आजाराची ( Measles Patients in mumbai ) साथ पसरली आहे. या कालावधीत ३ हजाराहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. लहान मुलांपासून तरुणांनाही गोवर झाल्याचे समोर आले आहे. गोवरमुळे ९ मुलांचा मृत्यु झाला आहे. गोवरचा धोका लहान मुलांना अधिक असून ८० वर्षावरील वयोवृद्धांनाही गोवरचा धोका आहे. या वयोगटातील नागरिकांना गोवरची लागण होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. तरुणांना गोवरचा धोका ( Measles Patients) अधिक नसल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
मुंबईत गोवरचा प्रसार, ९ मृत्यू - मुंबईमध्ये शनिवार १९ नोव्हेंबरपर्यंत २६ लाख २७ हजार ६६७ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ३०३६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे १८४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. ६२ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. ९ रुग्ण ऑक्सिजनवर तर २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १५ हजार ००९ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. २६ ऑक्टोबर पासून मुंबईत ९ मृत्यू झाले आहेत. त्यामधील एक मृत्यू मुंबई मुंबई बाहेरील (भिवंडी) येथील आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. .
या कारणामुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष - मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात गोवर रुग्णांची आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या जे जे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना, गोवरचे लसीकरण कोविडच्या काळात कमी पडले आहे. लहान मुलांना जन्मानंतर एक ते दिड महिन्यात पोलिओ आणि इतर लसी दिल्या जातात. मुलं लहान असताना त्याच्या आईलाही काहीना काही कारणाने हॉस्पिटलमध्ये यावे लागते. यामुळे त्यावेळी लसीकरण करून घेतले जाते. त्यानंतर बाळ ९ महिन्याचे झाल्यावर गोवरची लास दिली जाते. मात्र हे प्रमाण इत्तर लसीकरणापेक्षा कमी झालेले असते. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गोवरची लस द्यायची अशी मोहीम शासनाने २०१८ मध्ये राबवली होती. कोविडमध्ये नागरिकांना घराबाहेर जाऊ नका, आपल्या लहान मुलांना कोविड पासून वाचवा, असे आवाहन केले जात होते. कोरोना नियम शिथिल झाल्यावर पालक आपल्या कामाच्या व्यापामुळे लसीकरण घेऊ शकले नसतील. गोवंडी येथे एकाच घरात दोन मृत्यू झालेल्या महिलेला १० मुले आहेत. त्यांच्या लसीकरणाची तारीख तीला लक्षात ठेवणे शक्यही झाले नसेल असे डॉ. सापळे यांनी सांगितले.