महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वंचित परवडली पण राष्ट्रवादी नको, काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर

आज दादर येथील टिळक भवनात काँग्रेसची आढावा बैठक सुरू झाली असून या बैठकीत राष्ट्रवादीसोबत विधानसभा निवडणुकीत गेलो तर आपला मूळ जनाधार परत येणार नसल्याचे अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे समोर आले आहे.

By

Published : Jun 7, 2019, 5:49 PM IST

Updated : Jun 7, 2019, 6:09 PM IST

दादर येथील टिळक भवनात काँग्रेसची आढावा बैठक सुरू झाली आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आता काँग्रेसला चांगले यश मिळवायचे असेल तर यापुढे वंचित सोबत आघाडी केलेली बरी मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी नको, असा सूर मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उमटला. राष्ट्रवादीसोबत विधानसभा निवडणुकीत गेलो तर आपला मूळ जनाधार परत येणार नसल्याचे अनेक पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितल्याचे समोर आले आहे.

माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

आज दादर येथील टिळक भवनात काँग्रेसची आढावा बैठक सुरू झाली असून या बैठकीला राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. या बैठकीत सकाळच्या सत्रात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यां सोबत बैठक झाली.

सकाळी झालेल्या बैठकीत राज्यातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत युती करायला हरकत नाही, असे मत व्यक्त केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच आम्ही त्यासाठी सकारात्मक आहोत. मात्र, जो निर्णय घ्यायचा आहे तो प्रकाश आंबेडकर यांनी घ्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे फोन

सकाळच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी फोन करून त्यांना आमिष दाखवत असल्याचा गौप्यस्फोट केला. मात्र, काँग्रेसचा एकही आमदार भाजप सोबत जाणार नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार?

लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठक सुरू असताना माझ्याकडे राजीनामे दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची माझीही नैतिक जबाबदारी आहे. मात्र, माझी दिल्लीत वरिष्ठांशी भेट झाली नाही. यामुळे पक्ष जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोपर्यंत मी एक पदाधिकारी म्हणून काम करत राहणार आहे, असे चव्हाण यावेळी म्हणाले.

Last Updated : Jun 7, 2019, 6:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details