मुंबई -बिकेसी चुनाभट्टी येथील कनेक्टर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर अखेर हा उड्डाणपूल रविवार (१० नोव्हेंबर) पासून वाहतुकीसाठी खुला करत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे जाहीर केले आहे.
बिकेसी चुनाभट्टीतील कनेक्टर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
या पुलामुळे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते चुनाभट्टी कनेक्टरमुळे ठाणे-नाशिक आणि पनवेल-पुणेकडे जाणारी वाहतूक सुकर होणार आहे.
धारावी आणि सायन जंक्शनवरील वाहतुकीची कोंडी टाळता यावी म्हणून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते चुनभट्टी असा १.६ किमी लांब, १ मीटर रुंद आणि चौपदरी उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या पुलामुळे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते चुनाभट्टी कनेक्टरमुळे ठाणे-नाशिक आणि पनवेल-पुणेकडे जाणारी वाहतूक सुकर होणार आहे. या उड्डाणपूलावरून पूर्व द्रुतगती महामार्गावर आणि जाण्यासाठी ४ लेन कनेक्टर असणार आहे. या उड्डाणपुलामुळे बीकेसी, बाबूभाऊ कंपाऊंड, मध्य रेल्वे (सायन जवळ), डंकन कॉलनी, हार्बर लाइन (चुनाभट्टी स्टेशन), सोमैया मैदान आणि ईईएच मधील जमीन या मार्गे फिश बेलीच्या आकाराचे एलिव्हेटेड कॉरिडोर उभारण्यात आले आहे.
उड्डाणपूलाचे उदघाटन होत नसल्याने या विभागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून या उड्डाणपुलावरील वाहतूक त्वरित सुरू करावी अन्यथा आम्ही वाहतूक सुरू करू, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला होता. याबाबत मुंबईकरांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रविवार पासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करत असल्याचे मुख्यमंत्र्यानी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.