महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई महापालिका वैधानिक समिती निवडणूक; भाजपचा शिवसेनेला पाठिंबा

महापालिकेच्या 4 वैधानिक समितीची निवडणूक ३ एप्रिलला होणार आहे. त्यासाठी आज (सोमवारी) अर्ज दाखल केले जाणार आहेत.

By

Published : Apr 1, 2019, 11:32 AM IST

मुंबई वैधानिक निवडणूक

मुंबई - महापालिकेच्या वैधानिक समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी कोण अर्ज भरणार अशी उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी युती झाल्याने भाजप समित्यांवर दावा करेल, अशी चर्चा होती. मात्र कोणताही वाद उद्भवू नये, म्हणून महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्या न लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप शिवसेनेला मदत करणार हे निश्चित आहे. विरोधी पक्षाकडे संख्याबळ नसल्याने ही निवडणूक एकतर्फी होणार आहे.


महापालिकेच्या 4 वैधानिक समितीची निवडणूक ३ एप्रिलला होणार आहे. त्यासाठी आज (सोमवारी) अर्ज दाखल केले जाणार आहेत. पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. तर सुधार समितीसाठी ज्येष्ठ नगरसेवक रमाकांत रहाटे किंवा राजू पेडणेकर तर शिक्षणसाठी मिलिंद वैद्य आणि बेस्टसाठी दत्ता नरवणकर या नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मुंबई महानगर पालिकेत या चारही समित्या महत्वाच्या मानल्या जातात. त्यापैकी पालिकेचा आर्थिक कारभार स्थायी समितीवर अवलंबून असतो. या समितीमध्ये जनतेच्या हितासाठीचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले जातात. विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव यांची कारकीर्द समाधानकारक राहिली आहे. निर्णय घेण्याची हातोटी आणि विरोधकांसह मित्रपक्षाला सोबत घेऊन काम करण्याची पद्धत पक्षश्रेष्ठींना भावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी त्यांना संधी मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सुधार समिती विद्यमान अध्यक्ष दिलीप लांडे यांच्या काळात काही भूखंडांचे प्रकरण पक्षावर शेकले होते. शिवाय, शिवसेनेकडून येत्या विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना तसे आश्वासनही देण्यात आले होते. ही बाब लक्षात घेता, त्यांच्या जागी ज्येष्ठ नगरसेवक रमाकांत रहाटे किंवा राजू पेडणेकर यांना संधी मिळू शकते. तर शिक्षण समितीवर माजी महापौर मिलिंद वैद्य यांची वर्णी लागणार आहे. मंगेश सातमकर हे विधानसभा लढविणार असल्याने हे फेरबदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आर्थिक तोट्यात गेलेल्या बेस्टला ट्रॅकवर आणण्यासाठी चांगला चेहऱ्याच्या शोधात शिवसेना असल्याचे समजते.

रविवारी याबाबत कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू होती. यापूर्वी कामगारांचे नेतृत्व केलेले अनिल कोकीळ यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर आशिष चेंबूरकर हेही अध्यक्षपदी होते. मात्र दरवर्षी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न असतो. तसा या वेळीही असणार आहे. त्यामुळे दत्ता नरवणकर हे चर्चेत असून ते या पदासाठी अर्ज भरू शकतील अशी चर्चा आहे. दरम्यान, चर्चेत नाव असले तरी आयत्यावेळी मातोश्रीवरून अचानक आदेश आल्यानंतर इच्छूकांनाही माघार घ्यावी लागते. गेल्या काही वर्षांचा अनुभव असल्याने आयत्यावेळी ठरलेली नावेही मागे पडू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details