मुंबई :पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीतील कुठला पक्ष निवडणूक लढवणार यावरून आत्ताच राजकीय चुरस रंगली आहे. गिरीश बापट यांच्या निधनाला चार दिवसही झाले नसल्याने ही रंगलेली राजकीय चढाओढ पाहता ही लढाई अतिशय अटीतटीची होणार यात शंका नाही. मागील महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाल्याने पोटनिवडणुक रंगतदार होणार असल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे.
भाजप विरुद्ध महाविकास आघाडी :भाजपच्या कसबा पेठमधील आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागेवर महिन्याभरापूर्वीच पोटनिवडणूक झाली. या जागेवर भाजपला हमखास विजयाची खात्री होती. मात्र, भाजपने रणनीती आखलेली असताना कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. तसेच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा या पोटनिडणुकीत विजयी झाला. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असून याची दखल राष्ट्रीय स्तरावर पक्षाकडून घेतली गेली.
विरोधकांची रस्सीखेच सुरू :अशातच आता पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार, वरिष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर या जागी सुद्धा पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीची घोषणा अद्याप घोषणा झाली नसुन तरी सुद्धा महिन्याभरापूर्वीचा इतिहास पाहता आतापासूनच विरोधकांची रस्सीखेच सुरू झाली आहे. ही जागा आम्ही लढवणारच असे ठामपणे माजी मंत्री, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे थोडे सबुरीने घ्या, इतकी घाई करण्याची गरज नाही. कारण गिरीश बापट यांच्या निधनाला तीनच दिवस झाले आहेत, असा प्रेमाचा सल्ला विरोधी पक्ष नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला आहे.
बापट यांच्या कुटुंबात उमेदवारी :कसबा पेठ पोटनिवडणुकीचा पराभव हा भाजपच्या जिव्हारी लागल्याने महा विकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. पुणे लोकसभा निवडणुक या विषयी काँग्रेस किंवा त्यांचे नेते उघडपणे बोलत असले तरीसुद्धा भाजपने न बोलता पुणे मतदार लोकसभा संघासाठी आखणी करायला सुरुवात केली आहे. या विभागातून गिरीश बापट यांच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी द्यायची की, इतर उमेदवार द्यायचा याची चाचपणी सुरू झाली आहे. कसबा पेठची जागा हातातून गेल्याने भाजपची रणनीती फोल ठरली.