मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. यासंदर्भात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी परखड मत व्यक्त केले आहे. या प्रकरणी पोलीस व राज्य शासनाकडून हवे तेवढे अॅग्रेशन दाखवण्यात आलेले नाही. तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी तपासासाठी अधिक वेळ घेतल्यामुळे त्यांच्यावर राजकीय टीकाटिप्पणी होत आहे. आता न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे तपास गेला आहे. वेळ आली तर सीबीआयवर देखील असाच राजकीय टीकेचा भडिमार होऊ शकतो, असे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
मुंबई पोलिसांसारखी सीबीआयवर सुद्धा होऊ शकते राजकीय टीका- अॅड. उज्ज्वल निकम
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी तपासासाठी अधिक वेळ घेतल्यामुळे त्यांच्यावर राजकीय टीकाटिप्पणी होत आहे. आता न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे तपास गेला आहे. वेळ आली तर सीबीआयवर देखील असाच राजकीय टीकेचा भडिमार होऊ शकतो, असे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
बिहार पोलीस महासंचालक बेधडकपणे माध्यमांसमोर येऊन वक्तव्य करत आहेत. मुंबई पोलिसांवर टीका करत आहेत. असे असताना आपल्या राज्याचे पोलीस महासंचालक मात्र गप्प बसले आहेत. पोलीस व राज्य सरकारने योग्य वेळी योग्य उत्तरे न दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या पारड्यात सुशांत प्रकरणाचा तपास टाकला आहे. या निर्णयामुळे आपण समाधानी असलो तरी या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाखाली झाला असता तर अधिक चांगले झाले असते, असेही निकम यांनी म्हटले.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकराणातील सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.