लातूर - आरोग्यावर होणारा खर्च आणि सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती पाहता जेनेरिक मेडिकलच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. दोन वर्षांपूर्वी सवलतीच्या दरात औषध ही जेनेरिक मेडिकलवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पण जनजागृतीचा आभाव आणि वैद्यकीय रुग्णालयांचे खासगीकरण यामुळे या जेनेरिक मेडिकल पेक्षा ओढा आहे, तो खासगी मेडिकलवर. त्यामुळे सरकारचा उद्देश तरी साध्य होणार की नाही याबाबत साशंका उपस्थित होत आहे.
बदलत्या परिस्थिती नुसार मूलभूत गरजानंतर प्राधान्य दिले जाते ते आरोग्याकडे. दिवसेंदिवस यावरील खर्च हा वाढतच आहे. म्हणून जेनेरिक मेडिकल उभारून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. कोणत्याही प्रकारच्या ब्रँडची औषधे नाहीत. पण त्यामध्ये कोणती कमीही नाही अशी जेनेरिक औषधालय उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी रुग्णांना 30 ते 40 टक्के रकमेत सूट मिळते. लातूर जिल्ह्यात अशी 41 जेनेरिक औषधालय आहेत. विषेश म्हणजे सर्वच्या सर्व सुरू ही आहेत. काळाच्या ओघात जनजागृती होत असून काही प्रमाणात का होईना नागरिक आता या मेडिकलची पायरी चढू लागले आहेत. पण ही संख्या तुलनेने खूप कमी आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा पुरवठा या ठिकाणी केला जातो. शिवाय 2 शहराच्या रचनेनुसार या औषधालयांची संख्या ठरवली जाते.
रुग्णांच्या नातेवाईकांची मानसिकता आणि खासगी डॉक्टरांचा स्वार्थ
लातूर शहरात 14 औषधालय आहेत. यामध्ये सर्वात अडसर ठरत आहे ती रुग्णांच्या नातेवाईकांची मानसिकता आणि खासगी डॉक्टरांचा स्वार्थ. कमी किंमतीचे म्हटले ते हलक्या प्रतीचे असा समज आजही कायम आहे. पण येथील दर्जाबाबत खुद्द सरकारने सांगूनही नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. तर खासगी डॉक्टर हे विशिष्ट ब्रँडचीच औषधे सांगतात. त्यामुळे जेनेरिक औषधालायकडे न जाता जास्त किमतीने का होईना पण ब्रँड असलेल्याच औषधांची खरेदी केली जाते. शिवाय अनेक डॉक्टरांचेच मेडिकल आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांच्या खिशाला कात्री, स्वतःची कमाई अशी मानसिकता ही डॉक्टरांची आहे. पण या औषधालायला घेऊन सरकारही मोठी जनजागृती करीत आहे. पण नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणे आवश्यक आहे.