महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विकास आवश्यकच, पर्यावरणाचा ऱ्हास करून केलेला विकास काय कामाचा? - अतुल देऊळगावकर

मेट्रो कारशेडसाठी आरे येथील करण्यात आलेली वृक्षतोड ही दुःखद आहे. विदेशात पर्यवरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात. तर आपल्या देशात निसर्गाने दिलेली देण नष्ट केली जात असून सरकारने योग्य निर्णय न घेतल्याने हा ऱ्हास झाल्याचे देऊळगावकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले.

By

Published : Oct 8, 2019, 10:50 AM IST

Updated : Oct 8, 2019, 12:43 PM IST

अतुल देऊळगावकर

लातूर -आरे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने झाडे तोडण्यावर स्थगिती आणली. त्यानंतर अनेक पर्यावरण प्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले. पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी काळाच्या ओघात मेट्रो आवश्यकच असल्याचे म्हणले आहे. मात्र, पर्यावरणाचा ऱ्हास करून होत असलेला विकास काय कामाचा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

आरे प्रकरणी पर्यावरण तज्ञ अतुल देउळगावकरांची प्रतिक्रिया

मेट्रो कारशेडसाठी आरे येथील करण्यात आलेली वृक्षतोड ही दुःखद आहे. विदेशात पर्यवरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात. तर आपल्या देशात निसर्गाने दिलेली देण नष्ट केली जात असून सरकारने योग्य निर्णय न घेतल्याने हा ऱ्हास झाल्याचे देऊळगावकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले.

मेट्रोसाठी एक नव्हे तर सरकारपुढे सात पर्याय उपलब्ध होते. मात्र, योग्य निर्णय न घेतल्याने तब्बल २ हजार वृक्षांची कत्तल झाली. जगातील ५० हरित शहरात भारताचे एकही शहर नाही. या यादीत देशाचा समावेश होण्यासाठी देशाला अनेक संधी उपलब्ध झाल्या. मात्र, त्याचा आपण उपयोग करून घेतला नाही. केवळ मेट्रोचा विषय नाही तर त्याला लागून पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी पुन्हा भूगर्भातील पाणी घेतले जाणार. जंगलात पडणाऱ्या पावसाचे पाणी जंगलातच मुरते तेदेखील वृक्षतोड केल्याने होणार नाही. त्यामुळे ही वृक्षतोड करण्यापूर्वी होणाऱ्या दुष्परिणामाचाही विचार होणे गरजेचे होते. निसर्ग आणि विकास हे काय परस्परविरोधी घटक नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस ऑक्सिजन कमी होत आहे. यातच आता ही वृक्षतोड म्हणजे समस्यांना आमंत्रण देणारं आहे. मेट्रोची गरज आहे. मात्र, याकरता हीच जागा का हा प्रश्न कायम आहे.

तीच जागा का?

राज्य सरकारने ठरवले तर मेट्रोचा प्रकल्प अन्य कोणत्याही ठिकाणी होऊ शकतो. मात्र, तीच जागा का? हा प्रकल्प होण्यापूर्वी अशा वेगवेगळ्या ७ जागा प्रस्तावित होत्या. मात्र, हीच जागा का निवडण्यात आली याचा विचार होणे गरजेचे आहे.

वृक्षलागवडीच्या नियमांचे कुठे होते पालन?

वृक्षलागवडीच्या अनुषंगाने एक ना अनेक योजना राबविल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होते की, नाही हा संशोधनाचा विषय आहे. साधा रस्ता करताना एक झाड तोडले तर तीन झाडे लावणे हा नियम आहे. मात्र, याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने दिवसेंदिवस वृक्षाचे क्षेत्र कमी होत आहे. सध्या हवामान बदलाच्या काळात आपण आहोत. ही सर्व धोक्याची घंटा असताना अशाप्रकारे वृक्षतोड करणे म्हणजे समस्यांना आमंत्रण दिल्यासारखे आहे.

कार्बनची ब्लू प्रिंट कमी करणार आहोत का वाढवणार -

मेट्रो शहरांमध्ये वाढते कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः पुणे, मुंबई सारख्या शहरात याची झपाट्याने वाढ होत आहे. त्यावर वृक्षलागवड हा एकमेव पर्याय असून अशाप्रकारे वृक्षतोड होत असेल तर सरकार हे कार्बन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे का वाढवण्यासाठी हा प्रश्न आहे.

मेट्रोमुळे सार्वजनिक विकास होत असला तरी वृक्षतोडीने होणारे नुकसान हे न भरून निघणारे आहे. आणि राज्यसरकरच्या नियोजनाअभावी ते झाले असल्याची खंत देऊळगावकर यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - ...मग महाराष्ट्राच्या करदात्यांचा पैसा नेमका कुठे खर्च केला जातो? - कॉ. विश्वास उटगी

हेही वाचा - महाआघाडीच्या 'शपथनाम्या'त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी; केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण

Last Updated : Oct 8, 2019, 12:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details