कोल्हापूर - कोरोनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजन व्हावे, अशी सूचना मांडली होती. मात्र, यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. रामजन्मभूमी मुक्त होण्यासाठी 500 वर्षे संघर्ष करावा लागला. यामध्ये शिवसेनेने काहीही केले नाही. मात्र, यामध्ये मोठा वाटा असल्याचा दावा शिवसेनेने केल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. चंद्रकांत पाटील यांच्या या टिकेनंतर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची प्रतिक्रिया... हेही वाचा -शिवसेनेने राम मंदिरासाठी काहीही न करता केवळ पोकळ दावे केले; चंद्रकांत पाटलांची टीका..
कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. 'सत्ता येते आणि सत्ता जाते. मात्र, सत्ता गेल्यावर एव्हढेही कोणी हवालदील होऊ नये. राम जन्मभूमीसाठी खरे लढणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी आणि अनेकजण होते. मात्र, भाजपामधील त्या नेत्यांची आता पक्षात काय परिस्थिती आहे, सर्वांना माहिती आहे. शिवाय अनेक शिवसैनिकांवर दोषारोपपत्र दाखल झाले.
जेव्हा बाबरी मस्जिद पाडण्यात आली, त्यावेळी जबाबदारी घ्यायला भाजपाचे कोणीही पुढे आले नाहीत. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी घेतली होती. याचा आम्हा सर्व हिंदूंना सार्थ अभिमान आहे. त्यावेळी भाजपाचे सर्व कुठे गेले होते? कुठे लपून बसले होते?' असा सवाल शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केला आहे. शिवाय त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. खुर्ची नसल्यामुळे हवालदिल झालेली मंडळी राजकारण ढवळायचे काम करत असल्याची टीका संजय पवार यांनी केली.