महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हातकणंगले मतदारसंघ : शेट्टींची हॅट्रीक होणार की धैर्यशील माने विकेट घेत दिल्ली गाठणार?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख विद्यमान खासदार राजू शेट्टी हे तर त्यांच्याविरोधात युतीकडून शिवसेनेचे धैर्यशील माने मैदानात उतरलेत.

By

Published : Apr 8, 2019, 10:10 AM IST

हातकणंगले मतदारसंघ

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख विद्यमान खासदार राजू शेट्टी हे तर त्यांच्याविरोधात युतीकडून शिवसेनेचे धैर्यशील माने मैदानात उतरलेत. या मतदारसंघात राजू शेट्टी यांचे पारडे जड दिसत असले तरी या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी राजू शेट्टी हॅट्रीक साधणार की धैर्यशील माने त्यांची विकेट घेत दिल्ली गाठणार याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.


हातकणंगले लोकसभा मतदारसंघ एकूण ६ विधानसभा मतदारसंघात विभागलेला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघापैकी शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, आणि शिरोळ या ४ आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा या २ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी येथे मोठ्या मताधिक्याने बाजी मारली आहे. पण यंदा त्यांच्यासमोर शिवसेनेच्या धैर्यशील माने या नवख्या उमेदवाराचे मोठे आव्हान असणार आहे.

हातकणंगले मतदारसंघ


जातीय समीकरणे

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरण पाहिल्यास जैन, लिंगायत आणि मराठा समाजाची संख्या पहायला मिळते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.


मतदारसंघाची पार्श्वभूमी

दशकभरापूर्वी हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. या मतदारसंघात सर्वाधिक वेळा निवडून येण्याची संधी काँग्रेसच्या खासदाराला मिळाली. यामध्ये दत्ताजी कदम, बाळासाहेब माने, कल्लाप्पा आवाडे यांचा समावेश होता. त्यानंतर काँग्रेसचा हा गड निवेदिता मानेंच्या रूपाने राष्ट्रवादी पक्षाने १९९९ आणि २००४ च्या निवडणुकीत सर केला. पण २००९ आणि २०१४ या २ लोकसभा निवडणुकात अनुक्रमे माने व आवाडे यांना पराभूत करून राजू शेट्टी यांनी संसदेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा फडकवला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. त्यामुळे यावेळी शेट्टींविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार यावरून चर्चा सुरू होती. मात्र, राजू शेट्टी यांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यापासून राजकीयदृष्टया ते काँग्रेसच्या जवळ आले. त्यामुळे आघाडीने शेट्टींसाठी हातकणंगले आणि सांगली मतदारसंघ अशा २ जागा सोडल्या. या दोन्ही मतदारसंघामध्ये आजदेखील शेट्टी यांचा मोठा प्रभाव असल्याचे पाहायला मिळत आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

मतदार संख्या - १६ लाख ९ हजार
उमेदवार पक्ष मिळालेली मते
राजू शेट्टी – स्वाभिमानी शेतकरी संघटना – ६ लाख ३९ हजार १९१
कल्लाप्पा आवाडे – राष्ट्रवादी काँग्रेस – ४ लाख ६१ हजार ८३५
सुरेश पाटील – अपक्ष – २५ हजार ६२५

नोटा – - १० हजार ३५

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पक्षीय बलाबल

हातकणंगले मतदारसंघात कोल्हापूरच्या ४ आणि सांगलीतील २ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे..
शाहूवाडी –- सत्यजीत पाटील (शिवसेना)
हातकणंगले - –सुजित मिंचेकर (शिवसेना)
इचलकरंजी -– सुरेश हळवणकर (भाजप)
शिरोळ - – उल्हास पाटील (शिवसेना)
इस्लामपूर -– जयंत पाटील (राष्ट्रवादी)
शिराळा -– शिवाजीराव नाईक (भाजप)

एकूण ६ विधानसभा मतदारसंघापैकी ३ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे, २ मतदारसंघात भाजपचे तर एका ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. सत्तेत असूनही ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा ही शेट्टी यांची जमेची बाजू आहे. वस्त्रोद्योग, वारणा पाणी योजना यासारखे काही मुद्दे त्यांना त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने या नव्या नेतृत्वाचे आव्हान असणार आहे. त्यांचा चळवळीतील नेतृत्व असलेले शेट्टी यांच्याशी सामना करण्यासाठी युतीच्या ५ आमदार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील अशा ६ जणांची मोठी फौज समोर असणार आहे.


कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या भागात प्रामुख्याने ऊसाची शेती केली जाते. खासदार राजू शेट्टी यांनी वारंवार ऊस आणि दुधाला चांगली किंमत मिळावी यासाठी लढा दिला. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे स्वतः शेतकरी मला वर्गणी देऊन निवडून आणतात. त्यामुळे सर्वजण माझ्यासोबत असून मला कसलीच चिंता करायची गरज नसल्याचे शेट्टी म्हणतात.

विरोधकांकडून मात्र शेट्टी हे विकासाची कामे करण्यात अपयशी ठरल्याची टीका केली जाते. मतदारसंघात शेतीच्या बरोबरीने औद्योगिक विस्तार मोठा आहे, पण उद्योग आणि उद्योजकांना शेट्टी यांनी वाऱ्यावर सोडल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातो. विकासाच्या बाबतीत अपयशी खासदार म्हणून राजू शेट्टी यांच्याकडे पाहावे लागेल. त्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे हा मतदारसंघ दहा वर्षे मागे गेला असल्याची टीका विरोधी उमेदवार धैर्यशील माने यांनी केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा यावेळच्या निवडणुकीत शेट्टींचा पराभव कोणी रोखू शकत नाही आणि त्यांच्या पायाखाली वाळू सुद्धा सरकली असल्याचे म्हटले आहे.


विनय कोरेंची भूमिका महत्वाची

माजी मंत्री विनय कोरे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला पाठिंबा दिला. पण हातकणंगले मतदारसंघात मात्र त्यांनी कोणाला पाठिंबा देणार हे मात्र स्पष्ट केले नाही. जर यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर विधानसभेच्या वेळी कोरे यांच्या विरोधात शिवसेनेचेच विद्यमान आमदार सत्यजित पाटील सुरूडकर असणार आहेत. त्यामुळे त्यांनी अद्याप याबाबत कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही. पण कोरे यांचा पाठिंबा धैर्यशील माने यांच्यासाठी निर्णायक असणार आहे.

राजू शेट्टी यांनी अनेक आंदोलने करत ती यशस्वीही करुन दाखवली आहेत. त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा आपल्या मागे उभा केला. पण शिवसेनेच्या धैर्यशील माने यांचे मोठे आव्हान शेट्टीसमोर असणार असून गेल्या वेळच्या निवडणुकीप्रमाणे शेट्टींना ही निवडणूक सोपी नसणार असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. अद्याप राजू शेट्टी यांचे पारडे किंचित जड वाटत असले तरी धैर्यशील मानेंचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details