जालना - मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकार भक्कमपणे न्यायालयात बाजू मांडत आहे. त्यामुळे मराठा समाजाने सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी संवाद साधताना. मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन -
अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मिळावे, या मागणीसाठी 20 जानेवारीपासून उपोषण, ठिय्या आंदोलन आणि आता चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना, सध्या हे प्रकरण न्यायालयीन आहे. त्यामुळे समाजाने सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.
हेही वाचा -विधानसभा अध्यक्ष कोणाला करायचे हे काॅंग्रेस ठरवेल - छगन भुजबळ
मंत्री चव्हाण यांना साष्ट पिंपळगावला आणतो -
मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आमदार अशोक चव्हाण यांच्याशी यापूर्वी बोललो आहे. अजूनही त्यांच्यासोबत बोलून त्यांना साष्ट पिंपळगाव येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांशी बोलण्यासाठी आपण घेऊन येऊ, असे आश्वासनही मंत्री राजेश टोपे यांनी दिले. त्याचसोबत मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता घ्यायचे आहे. त्यासाठी न्यायालयात योग्य बाजू मांडणे ही सुरू आहे, असे सांगून पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या योजनेला गती देण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट कर्ज मिळावे, यासाठीदेखील आपण प्रयत्नशील आहोत. सध्या हे कर्ज बँकेमार्फत मिळत आहे. याचा फायदादेखील मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले.