जालना- तालुक्यातील जळगाव येथील एक २४ वर्षीय तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर बुधवारी सकाळच्या सुमारास त्या तरुणाचा रामनगर गावाच्या शिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. ज्ञानेश्वर एकनाथ वाघमारे असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेपूर्वी प्रेमप्रकरणातून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या मृत्यूमागे आत्महत्या किंवा घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
तरुण कापड दुकान व्यावसायिक-
जालना तालुक्यातील सोमनाथ जळगाव येथे घटनेतील ज्ञानेश्वर वाघमारे हा त्याचा मोठा भाऊ भानुदास एकनाथ वाघमारे( 27) आई आणि वहिनी यांच्यासह स्वतःच्या शेतात राहतात. येथून जवळच जळगाव रोडवर त्यांचे कपड्याचे दुकान आहे. या कपड्याचा दुकानाचा सर्व व्यवहार ज्ञानेश्वर पाहत होता. दरम्यान, 13 तारखेला रात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर एकनाथ वाघमारे हा घाबरलेल्या अवस्थेत दिसला. त्याने मोठा भाऊ भानुदासला सांगितले की, 'गावातील कृष्णा भिकाजी दंडाईत त्यांनी मला फोनवर धमकी दिली आहे, की तू(ज्ञानेश्वर) माझ्या मुलीकडे का पाहतो, त्यानंतर त्यांचा मेहुणा विलास धांडे यांनीदेखील फोनवर त्याला धमकी देऊन तुला पाहून घेऊ असेही म्हटले आहे"
या प्रकरणानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी १५ फेब्रुवारीला भानुदास यांनी दंडाईत, धांडे आणि गावातील प्रतिष्ठित मंडळींची बैठक झाली. त्यानंतर हे प्रकरण मिटले. परंतु थोड्याच वेळाने विलास धांडे यांनी भानुदास वाघमारे यांना फोन लावून पूलाजवळ भेटण्यास सांगितले, तसेच नाही आला तर पुढे काय होईल हे सांगता येणार नसल्याची धमकीही दिली. हे सर्व बोलणे बाजूलाच बसलेल्या ज्ञानेश्वरने ऐकले होते. त्यामुळे घाबरलेला ज्ञानेश्वर पंधरा तारखेला संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास घरातून बेपत्ता झाला. परंतु पैशाचे पाकीट आणि अन्य वस्तू त्याने घरातच ठेवल्या होत्या, त्यामुळे त्याचा इतरत्र शोध घेतला मात्र कुठेही तो सापडला नाही.
मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार-
ज्ञानेश्वर कुठेही सापडत नसल्यामुळे त्याच्या भावाने मोजपुरी पोलीस ठाण्यामध्ये ज्ञानेश्वर हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ब्राह्मण खेडाच्या शिवारातल्या एका विहिरीमध्ये ज्ञानेश्वर वाघमारे याचा मृतदेह तरंगत असल्याचा दिसला. या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला होता. मात्र, या प्रकरणात घातपाचा संशय असल्याने वाघमारेकुटुंबीयांनी जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला.
पोलिसांनी या नातेवाईकांना विश्वासात घेऊन कायद्याची बाजू समजावून सांगितली आणि मृतदेहावर अंत्यविधी केले. याप्रकरणी भानुदास एकनाथ वाघमारे यांनी मोजपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कृष्णा दंडाईत व विलास धांडे या दोन आरोपींविरुद्ध कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.