जळगाव -जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. सद्यस्थितीत 80 ते 85 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यावर्षी सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असल्याने रब्बीचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहे. जिल्ह्यात यावर्षी सुमारे अडीच लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र हे हरभऱ्याचे तर, त्या खालोखाल मक्याचे क्षेत्र आहे.
डिसेंबरअखेर गव्हाची पेरणी
जळगाव जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात वार्षिक सरासरीच्या 162 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका, नद्या तसेच इतर स्त्रोतांना मुबलक पाणीसाठा आहे. पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला जोमाने लागले. रब्बीच्या लागवडीसंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना कृषी उपसंचालक अनिल भोकरे म्हणाले, की जिल्ह्यात एकूण साडेसात लाख हेक्टरवर खरीप हंगामात पेरणी होते. त्यातील जवळपास सव्वा ते दीड लाख हेक्टरवर दरवर्षी रब्बी हंगामाची पेरणी होते. यावर्षी पाणी उपलब्ध असल्याने रब्बीच्या पेरणीत 50 ते 75 हजार हेक्टरने वाढ झाली आहे. कृषी विभागाने यावर्षी दोन ते सव्वादोन लाख हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी होईल, असा अंदाज सुरुवातीला वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. अडीच लाख हेक्टरपर्यंत रब्बीची पेरणी होईल, असा अंदाज आहे. कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी दिवाळीच्या काळातच कापूस उपटून फेकला. कापसाच्या जागी मका, हरभरा पेरला. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले. आता डिसेंबर अखेरपर्यंत बागायती कापसाचे क्षेत्र रिकामे होऊन त्यावर गव्हाची पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
हरभऱ्याचे सर्वाधिक क्षेत्र
यावर्षीदेखील रब्बी हंगामात सर्वाधिक क्षेत्र हे हरभऱ्याचे आहे. रब्बीच्या एकूण अडीच लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 70 ते 80 हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल क्षेत्र हे मका पिकाचे आहे. 40 ते 45 हजार हेक्टरवर मका लागवड झाली आहे. याशिवाय गहू 17 ते 18 हजार हेक्टर तसेच 20 ते 22 हजार हेक्टरवर दादरची लागवड झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कापसाच्या जागी गव्हाची पेरणी होईल. त्यामुळे गव्हाचे क्षेत्र 5 ते 7 टक्क्यांनी अजून वाढेल, असेही अनिल भोकरे यांनी सांगितले.