महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 18, 2021, 9:43 PM IST

Updated : Aug 18, 2021, 10:49 PM IST

ETV Bharat / state

बीएचआर पतसंस्थेत अवसायकाच्या काळातच सर्वाधिक अनागोंदी, ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले!

देशभरातील ७ राज्यांमध्ये अडीचशेपेक्षा जास्त शाखा असलेली जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात 'बीएचआर' ही पतसंस्था एकेकाळी नावाजलेली पतसंस्था होती. मात्र, संचालक मंडळाच्या नियमबाह्य आणि अनियमित व्यवहारांमुळे ही पतसंस्था अवसायनात गेली. त्यामुळे ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत.

Bhaichand Hirachand Raisoni
Bhaichand Hirachand Raisoni

जळगाव-रायसोनी पतसंस्थेची विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणण्यासह ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने पतसंस्थेवर अवसायकाची नियुक्ती केली होती. परंतु, अवसायकाच्या काळातच कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

बीएचआर पतसंस्थेचा गैरव्यवहार नेमका काय आहे, या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत किती जणांना अटक केली आहे, गैरव्यवहाराचे स्वरूप कसे आहे, याचा 'ईटीव्ही भारत'ने या विशेष रिपोर्टमधून आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. देशभरातील ७ राज्यांमध्ये अडीचशेपेक्षा जास्त शाखा असलेली जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात 'बीएचआर' ही पतसंस्था एकेकाळी नावाजलेली पतसंस्था होती. मात्र, संचालक मंडळाच्या नियमबाह्य आणि अनियमित व्यवहारांमुळे ही पतसंस्था अवसायनात गेली. त्यामुळे ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत.

हेही वाचा-राज्यात ऑक्सिजन मर्यादित, सण-उत्सवात नियमांचे उल्लंघन करू नका! मुख्यमंत्र्यांचे आवाहन

अशा पद्धतीने केला 'झोल'-

बीएचआर पतसंस्था अवसायनात गेल्यानंतर राज्य सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये जितेंद्र कंडारे याची अवसायक म्हणून नियुक्ती केली होती. पतसंस्थेने वाटलेल्या कर्जाची वसुली करून ठेवीदारांच्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या ठेवी परत करायच्या होत्या. तसेच पतसंस्थेची कर्जवसुली आणि मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांची लिलाव प्रक्रिया राबवून त्यातून येणाऱ्या सुमारे ९०० कोटी रुपयांच्या उत्पन्नातून पतसंस्थेला अवसायनातून बाहेर काढणे, हे काम अवसायकाला करायचे होते. परंतु, अवसायक जितेंद्र कंडारे याने संशयित आरोपी सुनील झंवर, सीए महावीर जैन तसेच इतरांशी संगनमत करून मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

बीएचआर पतसंस्थेत अवसायकाच्या काळातच सर्वाधिक अनागोंदी
  • पतसंस्थेच्या मालमत्ता कवडीमोल भावात विकल्या. त्यासाठी पतसंस्थेची बनावट वेबसाईट तयार केली. ही वेबसाईट सुनील झंवरच्या जळगावातील कार्यालयातून ऑपरेट केली जात होती.
  • या वेबसाईटच्या माध्यमातून निविदा व लिलाव प्रक्रियेवर अंकुश ठेवला जात होता. त्या माध्यमातून पतसंस्थेच्या मालमत्तांची संबंधितांनी अगदी कवडीमोल दरात खरेदी केली. धक्कादायक बाब म्हणजे, या मालमत्ता घेण्यासाठी आरोपींनी ठेवीदारांकडून त्यांच्या ठेवींच्या पावत्या देखील टक्केवारीने कमी किंमतीत घेऊन त्यांचाही वापर केला.
  • मॅचिंगचे व्यवहार याठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाले. पतसंस्थेच्या काही बड्या कर्जदारांनी देखील आपली कर्जफेड करताना ठेवीदारांकडून त्यांच्या ठेवींच्या पावत्या ३० ते ५० टक्के रक्कम देऊन घेतल्या.
  • मॅचिंगचे व्यवहार करून कर्जफेडीचे बनावट दाखलेही मिळवले. हा सारा प्रकार पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आला आहे.

हेही वाचा-अकोल्यात वंचित आघाडीचे महापालिकेसमोर ठिय्या; उपायुक्तांना खांद्यावर उचलत दिले निवेदन

१० महिन्यात १८ जणांना बेड्या-

बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्यातील डेक्कन, आळंदी व शिक्रापूर या ३ पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने २७ नोव्हेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१ या १० महिन्यांच्या काळात १८ संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यातील सर्व संशयित जामिनावर बाहेर आले आहेत. तर या गैरव्यवहारातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे हा न्यायालयीन कोठडीत आहे. तर नुकताच नाशकातून अटक झालेला दुसरा सूत्रधार सुनील झंवर हा पोलीस कोठडीत आहे.

हेही वाचा-लुकआऊट नोटीस असतानाही परमबीर सिंगांना अटक का नाही?, उपाधीक्षक शाम कुमार निपुंगे यांचा सवाल



पुणे आर्थिक गुन्हे शाखेने खऱ्या अर्थाने उलगडला गैरव्यवहार-

बीएचआर पतसंस्थेत अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याची चौकशी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने बीएचआर पतसंस्थेचा गैरव्यवहार उलगडला. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणात २७ नोव्हेंबर २०२० रोजी जळगावात पहिल्यांदा छापेमारी केली. तेव्हा सीए महावीर जैन, प्रकाश वाणी, विवेक ठाकरे, धरम सांखला, कमलाकर कोळी यांना अटक केली होती. यानंतर २२ जानेवारी २०२१ रोजी सुनील झंवरचा मुलगा सूरज झंवरला अटक झाली. या संशयितांच्या अटकेनंतर त्यांच्या चौकशीत आणि पोलीस तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या.

या आरोपींना अटक-

मॅचिंगचे व्यवहार, बड्या कर्जदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेली कर्जफेड समोर आल्याने पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या १५ पथकांनी १७ जून २०२१ रोजी राज्यभर छापेमारी करत ११ संशयितांना अटक केली. अटक झालेल्यांमध्ये भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा (जळगाव) यांचा समावेश होता. त्यानंतर फरार असलेला अवसायक जितेंद्र कंडारेला २७ जूनला इंदूर येथून तर दुसरा मुख्य सूत्रधार सुनील झंवरला १० ऑगस्टला नाशकातून अटक झाली.

न्यायालयाच्या दणक्यानंतर बड्या कर्जदारांकडून कर्जाचा भरणा-

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या ११ बड्या कर्जदारांना न्यायालयाने जामीन दिला आहे. या संशयितांना कर्जाच्या ४० टक्के रक्कम तत्काळ भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार संशयितांनी ३ कोटी १३ लाख १७ हजार ६८३ रुपये न्यायालयात भरले आहेत.

अडीच हजार पानांचे पहिले दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल-

अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी ८९ व्या दिवशी तपास पूर्ण करून फेब्रुवारी २०२१ मध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम सांखला, कमलाकर कोळी व सुजित वाणी या पाच जणांविरुद्ध हे दोषारोप ठेवण्यात आले आहेत. यात ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.


संस्थापक रायसोनी यांच्यासह १४ जणांवरही सुरू आहे खटला-

जळगावात मुख्यालय असलेल्या बीएचआर पतसंस्थेच्या महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये २६४ शाखा आहेत. यात २८ हजार ठेवीदारांच्या ११०० कोटींच्या ठेवी आहेत. त्यात इतर राज्यातील २०० कोटींच्या ठेवींचा समावेश आहे. पतसंस्था अडचणीत आल्यानंतर फेब्रुवारी २०१५ रोजी पतसंस्थेचे संस्थापक प्रमोद रायसोनी यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाला होता. पुढे पोलीस तपासात बीएचआरच्या संचालकांवर राज्यातील ८३ पोलीस ठाण्यांमध्ये एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले. संस्थेचे संस्थापक प्रमोद रायसोनी यांच्यासह १४ संशयित सध्या कारागृहात आहेत. या ८३ गुन्ह्यांचा एकत्रित खटला जळगाव जिल्हा न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. हे गुन्हे आणि न्यायालयीन खटला बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहाराचा पहिला अंक मानला जातो. त्यानंतर पुण्यातील गुन्हे आणि पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून झालेला तपास, अटकसत्र आणि न्यायालयीन कार्यवाही हा गैरव्यवहाराचा दुसरा अंक आहे.

दरम्यान, बँकेत 1 हजार कोटीचा घोटाळा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Last Updated : Aug 18, 2021, 10:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details