जळगाव -शहराच्या दैनंदिन सफाईसाठी महापालिकेने नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिलेल्या ठेक्यात महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांसह आयुक्तांचा देखील सहभाग आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. विजय पाटील यांनी केला. येणाऱ्या महासभेत वॉटरग्रेस व महापालिकेमध्ये दुवा म्हणून लवाद नेमण्याचा घाट बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर यांच्या सांगण्यावरूनच घातला जात असल्याचा दावाही अॅड. पाटील यांनी केला असून, त्यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे.
माहिती देताना अॅड. विजय पाटील हेही वाचा -मातृदिन विशेष - "परमेश्वरामुळेच आज माझं मातृत्त्व अबाधित"
अॅड. विजय पाटील यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अतुल तडवी आदी उपस्थित होते. १२ मे रोजी होणाऱ्या महासभेत वॉटरग्रेस व महापालिकेच्या दरम्यान दुवा म्हणून काम करण्यासाठी स्वतंत्र लवाद नेमण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. मात्र, लवाद नेमून महापालिकेचा कोणताही फायदा होणार नसून, यामुळे महापालिकेचे नुकसान होणार आहे. नगरसेवकांकडून केवळ फरार आरोपीला फायदा व्हावा, यासाठी लवाद नेमण्याचा घाट आखण्यात आल्याचा आरोप अॅड. विजय पाटील यांनी केला.
तर नगरसेवकांविरोधातही तक्रार करू
वॉटरग्रेस व महापालिकेत स्वतंत्र लवाद नेमण्यात आला तर महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. लवाद नेमून केवळ संबंधित ठेकेदाराला फायदा होणार असून, महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे, महासभेपुढे प्रशासनाने दिलेल्या ठरावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध करण्याची गरज आहे. नगरसेवकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली तर संबंधित नगरसेवकांविरोधात तक्रार केली जाईल, असा इशारा अॅड. विजय पाटील यांनी दिला. घरकुल प्रकरणात देखील लवादाने आरोपींच्या बाजूने एकतर्फी निर्णय घेतला होता. त्यामुळे, अनेक नगरसेवकांना शिक्षा देखील भोगावी लागत आहे. घरकुल प्रकरणापासून नगरसेवकांनी बोध घेऊन वॉटरग्रेसच्या लवाद नेमण्याच्या प्रक्रियेबाबत विचार करूनच निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.
भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांचीही भागीदारी?
महापालिकेत सत्तांतर झाले असले तरी प्रवृत्ती मात्र तीच आहे. या ठेक्यात भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांची देखील भागीदारी असून, अनेक नगरसेवक १५ हजार रुपये घेऊन वॉटरग्रेसबाबत चुप्पी साधून आहेत. तर, आयुक्त सतीश कुलकर्णी वॉटरग्रेसचे कंपनीचे वकील म्हणूनच काम करत असल्याचाही आरोप अॅड. विजय पाटील यांनी केला.
हेही वाचा -गावातील कोरोना : पाचोऱ्यात वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवर ताण, सत्ताधारी-विरोधकांमध्ये मात्र आरोप-प्रत्यारोप