जळगाव - केंद्र सरकारने भाजप नेते नारायण राणे यांना जशी सुरक्षा पुरवली, तशीच राज्याला आर्थिक सुरक्षा पुरवावी. केंद्राकडे अडकलेले राज्याचे त्वरित पैसे द्यावेत, अशी मागणी शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याच्या बैठकीसाठी गुलाबराव पाटील हे आज (गुरुवारी) दुपारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले होते. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नारायण राणेंना दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या विषयावरून त्यांनी केंद्र सरकारला उद्देशून चिमटा काढला.
आमची तर एवढीच अपेक्षा-यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, नारायण राणे यांना सुरक्षा देणे हा केंद्र सरकारचा विषय आहे. परंतु, आमचे म्हणणे एवढेच आहे की नारायण राणे यांना सुरक्षा पुरवण्यात केंद्र सरकारने जशी आगेकूच केली. तशीच राज्याला आर्थिक सुरक्षा पुरवण्यात करायला हवी. केंद्र सरकारने राज्याचे अडकलेले पैसे द्यावे, एवढीच आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
लस पूर्णपणे सुरक्षित, लसीकरणासाठी स्वतःहून पुढे यायला हवं-
कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. आता आरोग्य क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. साधारणपणे प्रत्येक लस घेतल्यानंतर काही तरी लक्षणे दिसून येतात. कोरोना लसीच्या बाबतीत पण तसेच आहे. म्हणून यापुढे लसीकरणासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे यायला हवे, असेही मत गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
हेही वाचा-'पलटीमार आणि खोटारड्या विनायक मेटेंनी महाराष्ट्राची माफी मागावी'