महाराष्ट्र

maharashtra

अर्थसंकल्प आमच्यासाठी निराशाजनकच, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

By

Published : Feb 1, 2021, 8:08 PM IST

केंद्रीय अर्थसंकल्पात हमीभाव दीडपट करण्यात आले आहे. हमीभाव दुप्पट झाले तरीही शेतकऱ्यांना परवडणारे नाही. गहु उत्पादक शेकऱ्यांप्रमाणेच कापूस, केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठीही भरीव तरतूद अपेक्षित होती. मात्र, ती न झाल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

जळगाव -देशपातळीवर शेतकरी आंदोलन सुरू असताना त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 1 फेब्रुवारी) केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांसाठी खूप काही देण्यात येईल, अशी अपेक्षा होती. अर्थसंकल्पाचा 40 टक्के भाग हा शेतकऱ्यांसाठी असेल, असे वाटत होते. मात्र, या अर्थसंकल्पाने देखील शेतकऱ्यांना निराश केले आहे, अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त दिल्या आहेत.

बोलताना शेतकरी

दीडपट हमीभाव म्हणजे गाजर..!

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मते, अर्थसंकल्पात करण्यात आलेली दीडपट हमीभाव ही घोषणा म्हणजे पुन्हा शेतकऱ्यांना दिलेले गाजर आहे. घोषणा करणे सोपे आहे. पण, त्याची अंमलबजावणी करण्याची कसरत असते. मुळात हमी भाव हाच सदोष आहे. त्यामुळे तो दीडपट करुन देखील उपयोग होणार नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही येणार नाही. पैसे कुठून येणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे.

अर्थसंकल्पात भरीव काही तरी हवे होते. दीडपट हमीभावाने शेतकऱ्यांच्या खर्च व उत्पादन खर्चातील तफावत भरुन निघणार नाही. शेतकऱ्यांना दुप्पट हमीभाव दिला तरी देखील तो परवडलेच असे नाही. गहु उत्पादक शेकऱ्यांप्रमाणेच कापूस, केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठीही भरीव तरतूद अपेक्षित होती. मात्र, तसे न झाल्याने खान्देशातील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याच्या भावना जळगाव जिल्ह्यातील किशोर पाटील, सतीश चिरमाडे व संदीप नारखेडे या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

कृषी निविष्ठांबाबत काहीही नाही

अर्थसंकल्पात कृषी निविष्ठांच्या बाबतीत काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी बियाणे, खते तसेच फवारणीची औषधी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यांच्या किंमती कमी करण्यासंदर्भातही कोणतेही ठोस धोरण सरकारने जाहीर केलेले नाही. मुळातच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या पदरी काही पडलेले नाही. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसणारा आहे, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा -महाराष्ट्रासाठी विचार केला तर अर्थसंकल्प निराशाजनक- एकनाथ खडसे

ABOUT THE AUTHOR

...view details