महाराष्ट्र

maharashtra

बार-हॉटेल मालकांप्रमाणे शेतकरी, कष्टकऱ्यांचीही दखल घ्या; रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र

By

Published : May 12, 2021, 11:02 AM IST

भाजप खासदार रक्षा खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद झाल्याने नाशवंत शेतमालाची विल्हेवाट लावणेदेखील शेतकऱ्यास परवडेनासे झाले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी राज्य सरकारकडून काही काळाची सवलत मिळायला हवी. यासाठी आपण पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे.

raksha_khadse_letter_to_pawar
खासदार रक्षा खडसे

जळगाव -कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील घटकांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यातल्या त्यात हातावर पोट असलेला शेतकरी आणि कष्टकऱ्यांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या सर्वांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. आपण बार आणि हॉटेल मालकांची तत्काळ दखल घेतली. त्याचप्रमाणे सामान्य शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकरी कुटुंबांचा आक्रोशही महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते या नात्याने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवावा. या कठीण काळात थोडाफार का होईना परंतु, या घटकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र भाजप खासदार रक्षा खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना लिहिले आहे.

रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र

गेले वर्षभर कोरोना महामारीमुळे सतत सुरू असलेल्या लॉकडाऊन व जिल्हाबंदीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव नाही, केंद्र सरकारचे पॅकेज वगळता राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही. जिल्हाबंदीमुळे वाहतूक बंद आहे. बाजार समित्या बंद असून हाताशी पैसा नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. अवकाळी पाऊस आणि वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती उत्पादनाचे प्रचंड नुकसान होत असून उभी पिके नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. शेतात ओतलेला पैसा मातीत गेला असून शेतकरी कधी नव्हे एवढा निराशेच्या गर्तेत सापडला आहे. बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद झाल्याने नाशवंत शेतमालाची विल्हेवाट लावणेदेखील शेतकऱ्यास परवडेनासे झाले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी राज्य सरकारकडून काही काळाची सवलत मिळायला हवी. यासाठी आपण पाठपुरावा करावा, अशी मागणी खासदार खडसेंनी पत्रात केली आहे.

पत्रातून साधला राज्य शासनावर निशाणा-

बार आणि हॉटेल व्यावसायिकांप्रमाणेच शेतकरीदेखील संकटात सापडला आहे. वीजबिल माफी योजनेचा घोळ अजून संपलेला नाही. शेतकऱ्यांच्या थकित वीजबिलात ३३ टक्के सवलत देण्याची राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा अजूनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेली नाही. दुष्काळी मदत आणि पिकविम्याच्या योजना शेतकऱ्यांपासून लांबच आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे कोणतेही नियोजन राज्य सरकारने याकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेले नाही. लॉकडाऊनमुळे जेव्हा इतर सर्व उद्योगधंदे बंद होते, तेव्हा शेतकरी मात्र शेतात राबून पिके घेत होता.

लॉकडाऊनच्या काळातही शेती व शेतीपूरक उद्योगच ग्रामीण कुटुंबांसाठी आधार असल्याने राज्य सरकारने अन्य उद्योगंधंद्यांप्रमाणे शेतकऱ्यांसाठीही पॅकेज जाहीर करावे. राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारप्रमाणे तातडीने ६ हजार रुपये जमा करावेत व तातडीने शेतकऱ्यांस मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यास मदत करण्यासाठीही पाठपुरावा केला पाहिजे, असे खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details