जळगाव -तालुक्यातील भादली बुद्रुक येथील अंजली पाटील (गुरू संजना जान) या तृतीयपंथीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. भादली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अंजली पाटील यांच्या स्त्री राखीव प्रवर्गातील उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्त्री राखीव प्रवर्गातील त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो छाननी प्रक्रियेत बाद ठरवला होता. यानंतर पाटील यांनी न्यायासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
काय होते प्रकरण?
जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील अंजली पाटील (गुरू संजना जान) या तृतीयपंथीने ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंजली पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. मतदार यादीत त्यांच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख 'इतर' असा असल्याने, त्यांना महिला राखीव प्रवर्गातून उमेदवारी दाखल करता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. परंतु, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर अंजली पाटील यांचे समाधान झाले नव्हते. त्यांनी आपली उमेदवारी वैध असून चुकीच्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज बाद केल्याचा आरोप केला होता. आपल्याकडे केंद्र सरकारने दिलेले आधार कार्ड तसेच मतदान कार्डावर तृतीयपंथी असा उल्लेख आहे. याशिवाय आपल्याकडे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र देखील असल्याने महिला राखीव प्रवर्गातून आपली उमेदवारी योग्य असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार अचूक निर्णय दिल्याचे स्पष्ट केल्याने हे प्रकरण चिघळले होते.
औरंगाबाद खंडपीठात घेतली होती धाव -