हिंगोली- ग्रामीण भागात शेताचे वाद मोठ्या प्रमाणात होतात. यात भांडणाचे मुख्य कारण असते शेताचे बांध फोडण्याचे. संपूर्ण शेतजमीन पडीक राहिली तरी हा बांध फोडण्याचा वाद कोर्टाच्या पायऱ्या चढायला भाग पाडतो. हा कळीचा मुद्दाच नष्ट करण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील घोडा या ग्रामपंचायतीने सर्वच ट्रॅक्टर मालकांना नोटीस बजावली आहे. यात नांगरणी किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने कोणतेही काम करताना बांध फुटल्यास सर्वस्वी ट्रॅक्टर मालकाला जबाबदार धरले जाणार आहे.
बांध न फोडण्याच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. सध्या शेतीची सर्वच कामे ही यंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत. कुठेही बैलजोडीचे काम उरलेले नाही. दोन दिवसांचे काम आता या यंत्राच्या सहाय्याने अवघ्या काही तासांतच पूर्ण होत आहे. मात्र, कमी वेळात जास्त होणारे काम हे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. रात्री-अपरात्री ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करत असताना शेतकरी शेजाऱ्याचा बांध फोडत असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत.