महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 31, 2020, 4:38 PM IST

ETV Bharat / state

शेतातील बांध फुटल्यास ट्रॅक्टरमालक जबाबदार, घोडा ग्रामपंचायतीचा निर्णय

ग्रामीण भागात शेताचे वाद मोठ्या प्रमाणात होतात. कित्येक वाद हे या शेतातील बांधावरून घडलेले आहेत. हा कळीचा मुद्दा नष्ट करण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील घोडा या ग्रामपंचायतीने सर्वच ट्रॅक्टर मालकांना नोटीस बजावली आहे.

tractor owner is responsible for blowing the smoke  of the field
शेतातील धुरा फुटल्यास ट्रॅक्टर मालक जबाबदार

हिंगोली- ग्रामीण भागात शेताचे वाद मोठ्या प्रमाणात होतात. यात भांडणाचे मुख्य कारण असते शेताचे बांध फोडण्याचे. संपूर्ण शेतजमीन पडीक राहिली तरी हा बांध फोडण्याचा वाद कोर्टाच्या पायऱ्या चढायला भाग पाडतो. हा कळीचा मुद्दाच नष्ट करण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील घोडा या ग्रामपंचायतीने सर्वच ट्रॅक्टर मालकांना नोटीस बजावली आहे. यात नांगरणी किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने कोणतेही काम करताना बांध फुटल्यास सर्वस्वी ट्रॅक्टर मालकाला जबाबदार धरले जाणार आहे.

बांध न फोडण्याच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. सध्या शेतीची सर्वच कामे ही यंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत. कुठेही बैलजोडीचे काम उरलेले नाही. दोन दिवसांचे काम आता या यंत्राच्या सहाय्याने अवघ्या काही तासांतच पूर्ण होत आहे. मात्र, कमी वेळात जास्त होणारे काम हे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. रात्री-अपरात्री ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने नांगरणी करत असताना शेतकरी शेजाऱ्याचा बांध फोडत असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत.

हा प्रकार कळमनुरी तालुक्यातील घोडा या गावी अनेक दिवसांपासून सुरू आहे. तक्रारींची संख्या पाहता ग्रामपंचायतीने यावर बैठक बोलावली. यानंतर सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांनी गावातील 30 ट्रॅक्टर मालकांना नोटीस बजावली आहे. यापुढे नांगरणी करत असताना कोणत्या शेतकऱ्याचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी ट्रॅक्टर चालक आणि मालकाला जबाबदार धरले जाईल, अशाा आशयाची नोटीस बजावण्यात आलेली आहे.

अनेकदा ट्रॅक्टर चालकाने बांध फोडण्यासाठी नकार दिला तरी शेतमालक त्याला बांध फोडण्यास भाग पडत असे. मात्र, आता ग्रामपंचायतीचा हा निर्णय खरोखरच सर्वांच्या हिताचा ठरून शेतीचे वाद कमी होण्यात उपयोगी ठरणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय घेणारी घोडा एकमेव ग्रामपंचायत असून हा निर्णय सर्वच शेतकऱ्यांनी अमलात आणण्याची नितांत गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details