महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहावी निकाल : गावात टॉपरपेक्षा 'या' बहाद्दराचीच चर्चा जास्त; 'हे' आहे कारण

दहावीत कमी गुण मिळाले. मात्र, बारावीत जास्त गुण घेऊन लॅब टेक्नीशियन होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आहे.

By

Published : Jun 9, 2019, 8:45 PM IST

सोपान वसंत कोरडे

हिंगोली - शनिवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात कोणी टक्केवारीची शंभरी गाठली तर कुणी सर्वच विषयात नापास झाले. मात्र, हिंगोली जिल्ह्यातील नव्हलगव्हान येथील एका बहाद्दराने चक्क सर्वच विषयात ३५ गुण मिळवून दहावीत यश मिळविले. त्याच्या या 'कट टु कट' मिळवलेल्या गुणांनी परिसरात त्याचे कौतुक होत आहे. अनेक जण तर त्याच्या सोबत सेल्फी काढून सोशल मिडियावर टाकत आहेत.

निकाल

सोपान वसंत कोरडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो गावापासूनच तीन किमी अंतरावर असलेल्या भांडेगाव येथील सुखदेवानंद विद्यालयात शिक्षण घेत होता. दहावीत कमी गुण मिळाले. मात्र, बारावीत जास्त गुण घेऊन लॅब टेक्नीशियन होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आहे. जास्त टक्के मिळालेल्या विद्यार्थांपेक्षा सगळ्या विषयात ३५ गुण घेणारा सोपानचा निकाल सर्वजण कुतुहलाने पाहत होते.

सोपानला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान समाजशास्त्र या सर्वच विषयात ३५ गुण मिळाले आहेत. ही बाब ग्रामस्थांना समजल्यानंतर गावातील तरुणांनी सोपानचे अभिनंदन करत जल्लोष केला. एवढेच नव्हे तर सोपानच्या या आगळ्या वेगवेगळ्या निकालाने गावाचे नाव चर्चेत आणल्याचे ग्रामस्थ सांगत होते. सोपान हा शेतकरी कुटुंबातील असून त्याने भांडेगाव ते नवलगव्हान अशी पायपीट करून शिक्षण घेतले.

दहावीत फक्त ३५ टक्के गुण घेतले. मात्र, बारावीला यापेक्षाही चांगले गुण मिळवेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. बारावीला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला तर एमएलटी, डीएमएलटी हा कोर्स पूर्ण करत लॅब टेक्नीशियन होण्याचा मानस सोपनने व्यक्त केला. सर्व विषयात १०० गुण मिळविणे जसे कठीण तसे सगळ्या विषयातही ३५ गुण मिळवणे ही पण एक किमया आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details