हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याचे प्रशासनाच्या अहवालातून समोर येत आहे. आज पुन्हा नव्याने एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून दोन कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आज घडीला विविध कोरोना केअर सेंटर व कोरोना वार्डमध्ये 29 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हिंगोली जिल्ह्यात रोज नव्याने रुग्ण आढळत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागातही कोरोना पसरला असल्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील एक व्यक्ती औरंगाबाद येथील सेठ नंदलाल धूत रुग्णालयामध्ये असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 192 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 163 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.