महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 12, 2020, 5:26 PM IST

ETV Bharat / state

दहशत निर्माण करणारा 'तो' वाघ अद्याप मोकाट; शेतकऱ्यांचा राजुऱ्यात रस्तारोको

राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वाघाला जेरबंद करण्याचे कार्य गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे, मागील नऊ महिन्यापासून सुरू असलेली मोहीम केवळ दिखावा ठरलेली आहे. या मोहिमेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र, वाघाला जेरबंद करण्यात यश आले नाही. त्यामुळे, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी आंदोलनकर्ता शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

Tiger terror Rajura
दहशत माजवणारा 'तो' वाघ अद्याप मोकाट

राजुरा (चंद्रपूर)- दहा शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात अद्यापही वनविभागाला यश आलेले नाही. त्यामुळे, संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज राजुरा येथे रास्ता रोको केला. शेतकऱ्यांनी वनविभागाच्या विरोधात नारेबाजी करीत वाघाला ठार करा, तसेच वाघाला जेरबंद करण्यात अपयशी ठरलेल्या वन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

माहिती देताना माजी आमदार अ‌ॅड. संजय धोटे व शेतकरी समन्वय समितीचे पदाधिकारी

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. राजुरा तालुक्यातील दहा शेतकरी, शेत मजुरांचा बळी घेणारा वाघ अद्यापही मोकळाच वावरत आहे. वाघाला ठार मारण्याची मागणी आजी-माजी आमदारांनी केली होती. मात्र, त्यानंतरही वनविभागाकडून ठोस पावले उचलल्या गेली नाहीत. वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला येणाऱ्या अपयशाने शेतकरी, शेतमजूर संतापले आहेत. त्यामुळे, शेतकरी, शेतमजूर समन्वय समितीने आज राजुरा येथे रस्तारोको केला. पंचायत समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. तहसील कार्यालय समोर वन विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांना शांत करण्यात आले.

त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली. उपविभागीय वनाधिकारी कल्याणी यांनी आंदोलनकर्ता शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या जानून घेतल्या. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. जवळपास बावीस गावातील शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

प्रमुख मागण्यांमध्ये, वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबीयांच्या वारसांना वनविभागात सामावून घेणे. मृतकांना २५ लाखाची तात्काळ मदत करणे. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास तात्काळ मदत मिळावी, यासह अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी, वाघामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरीप हंगाम असूनसुद्धा शेतावर जाणे बंद आहे. वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भीतीमध्ये जीवन जगत आहेत. वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वाघाला जेरबंद करण्याचे कार्य गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे, मागील नऊ महिन्यापासून सुरू असलेली मोहीम केवळ दिखावा ठरलेली आहे. या मोहिमेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, वाघाला जेरबंद करण्यात यश आले नाही. त्यामुळे, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी आंदोलनकर्ता शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष चेतन जयपूरकर, बाबुराव मडावी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन छेडण्यात आले. माजी आमदार अ‌ॅड. संजय धोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, महीपाल मडावी, दीपक मडावी, गंगाधर कन्नाके यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी होते.

हेही वाचा-खासगी रुग्णालयातील अँटीजेन चाचणी केंद्र बंद करा - खासदार बाळू धानोरकर

ABOUT THE AUTHOR

...view details