महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यात खरीप पीक कर्जाच्या उद्दिष्टांपैकी 43 टक्के पीक कर्ज वितरित

आतापर्यंत जिल्ह्यातील 37 हजार 272 शेतकऱ्यांना 178 कोटी 96 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे. यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने 34 हजार 602 शेतकऱ्यांना, 159 कोटी 75 लाख रुपये म्हणजे उद्दिष्टाच्या 64 टक्के कर्ज वितरित केले आहे.

By

Published : Jun 15, 2019, 9:30 AM IST

Updated : Jun 21, 2019, 10:24 AM IST

पीक कर्ज

भंडारा- खरिपाचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना वाटण्यात येणाऱ्या पीक कर्जाच्या उद्दिष्टांपैकी 43 टक्के कर्ज वाटले गेले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 136 कोटीने कर्ज वाटपाचे उद्दिष्ट कमी केले आहे. आजपर्यंत जिल्हा बँकेने 61 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून राष्ट्रीयकृत बँकेने केवळ ८ टक्के आणि ग्रामीण बँकेने ते 23 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

15 जूननंतर राष्ट्रीयकृत बँकेतील पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढणार असून या वर्षी शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती होईल, असे जिल्हा अग्रणी प्रबंधक यांनी सांगितले आहे.

जिल्हा अग्रणी प्रबंधक खांडेकर यांची प्रतिक्रिया

भंडारा जिल्ह्यातील 98 हजार 260 शेतकरी सभासदांना 414 कोटी 50 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेला 250 कोटी रुपयांचे, राष्ट्रीयकृत बँकांना 114 कोटी रुपयांचे तर ग्रामीण बँकांना 50 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील 37 हजार 272 शेतकऱ्यांना 178 कोटी 96 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे. यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने 34 हजार 602 शेतकऱ्यांना, 159 कोटी 75 लाख रुपये म्हणजे उद्दिष्टाच्या 64 टक्के कर्ज वितरित केले आहे. याउलट राष्ट्रीयकृत बँकेने मात्र ८ टक्के पीक कर्ज वितरित केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांना 114 कोटी 20 लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, त्यांनी केवळ आठ कोटी 20 लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.

मागच्या वर्षी पीक कर्ज वाटण्याचे उद्दिष्ट 550 कोटी इतके होते. त्यापैकी 334 कोटी 77 लाख एवढे पीक कर्ज वितरित केले गेले होते. दरवर्षी ठेवलेल्या उद्दिष्टांची पूर्तता किती होत आहे, याचा आढावा घेऊन यावर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट कमी करून 414 कोटी एवढे ठेवण्यात आलेले आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत 136 कोटींचे उद्दीष्ट कमी करण्यात आले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकेचे पीक कर्ज वाटण्याचे प्रमाण कमी का? याविषयी विचारले असता जिल्हा अग्रणी प्रबंधक यांनी सांगितले की, मध्यवर्ती बँकेचा आर्थिक वर्ष हा 31 मार्च असतो तेव्हा शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करून एक एप्रिलपासून पुन्हा कर्ज घेता येते. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत एक एप्रिलपासून शेतकरी कर्ज घेतो तर राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेणारे शेतकरी हे 15 जूननंतर येतात. तसेच राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज वाटपासाठी विविध तालुक्यात मेळावेसुद्धा घेतात. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत राष्ट्रीयकृत बँकेचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत 100 टक्के कर्ज वाटले जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Last Updated : Jun 21, 2019, 10:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details