महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परळीच्या पाणी टंचाईस पंकजा मुंडे जबाबदार - धनंजय मुंडे

परळीच्या भाजप आमदारांनी स्वतःच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला वाण धरणातून अमर्यादित पाणी घेतल्यामुळेच परळी शहराला पाण्याची टंचाई भासत असून पाण्याअभावी परळीकरांच्या होणाऱ्या हालअपेष्टांना त्याच जबाबदार आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

By

Published : Jul 20, 2019, 9:22 AM IST

धनंजय मुंडे

बीड- परळीच्या भाजप आमदारांनी स्वतःच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला वाण धरणातून अमर्यादित पाणी घेतल्यामुळेच परळी शहराला पाण्याची टंचाई भासत असून पाण्याअभावी परळीकरांच्या होणाऱ्या हालअपेष्टांना त्याच जबाबदार आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार अजित पवार व धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ ते २२ जुलै विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत शुक्रवारी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे वॅाटर व्हिलर वितरण समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.

स्वतःच्या वैद्यनाथ कारखान्याला परळीचे पाणी घेतले. मात्र, शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले नाहीत. उलट परळीकरांचे पाणीही पळवले, असा आरोप करून नगरपालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा वाटप करण्यापेक्षा पालकमंत्री आणि या भागाच्या आमदार म्हणून परळीतल्या जनतेला पाणी देण्यासाठी त्यांनी काय केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

धनंजय मुंडे

वाण धरण कोरडे पडले असतानाही नगरपालिका 80 टॅंकरने पाणीपुरवठा करत आहे. आपण स्वतः नाथ प्रतिष्ठानच्या वतीने पंधरा लाख रुपये नगरपालिकेला दिले. नाथ प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स्वखर्चाने पाणीपुरवठा करत आहेत. याचा आपल्याला अभिमान वाटतो असेही मुंडे म्हणाले.

समाजातील प्रत्येक घटकांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी माझे सहकारी सातत्याने आधार देतात याचा आनंद वाटतो, असे सांगून वॅाटर व्हिलर वितरणाचा उपक्रम घेण्याची वेळ येऊ नये. परंतु, भीषण पाणी संकटच इतके झाले आहे की, सर्वच जलसाठे संपले आहेत. या परिस्थितीत पाणी वाहून आणण्यासाठीचा आपल्या डोक्यावरील भार वॅाटर व्हिलर वितरण करुन कमी करण्याचा प्रयत्न आहे.

परळी शहराला खडका बंधाऱ्यातून पाणी पुरवठा करण्यासंदर्भात सातत्याने आपण सरकारकडे पाठपुरावा केला असून हे पाणी आपल्याला लवकरच उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी प्रास्ताविकातून आधार महोत्सवातील विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.

वॉटर व्हीलर ज्यामध्ये तीन घागरी पाणी साठवले जाते आणि पन्नास लिटर पाणी अगदी अलगद ढकलत घरापर्यंत आणले जाते. पाणीटंचाई परिस्थितीचा विचार करता वॅाटर व्हिलर निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details