महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड : दुष्काळाची दाहकता; पाण्यासाठी करावी लागते मैलों-न-मैलोची पायपीट'

जिल्ह्यातील एकूण १४०४ गावांपैकी ६०६ गावे व ३२० वाड्यांवर भीषण दुष्काळाचे सावट आहे. प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करत आहे. टँकरचे पाणी दूषित असल्याने नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

By

Published : May 7, 2019, 10:20 PM IST

दुष्काळाची भयानकता; पाण्यासाठी करावी लागते पायपीट

बीड - बीड जिल्ह्यातील पाणी पातळी १२ मीटरहून अधिक खोल गेली आहे. जिल्ह्यासह मराठवाडा भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. एवढेच नाही तर पाटोदा तालुक्यातील उंबर विहिरा या गावातील अर्धे लोक गावाकडच्या दुष्काळाला वैतागून मुंबई-पुणे येथए स्थलांतरित होत आहेत. बीड जिल्ह्यात १४४ लघु व मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. यातील ५० टक्के लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत.

जिल्ह्यातील एकूण १४०४ गावांपैकी ६०६ गावे व ३२० वाड्यांवर भीषण दुष्काळाचे सावट आहे. प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करत आहे. टँकरचे पाणी दूषित असल्याने नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. सध्या बीड जिल्ह्यात ८५२ टँकर सुरू आहेत. तसे पाहता बीड जिल्ह्यासाठी पाणीटंचाई नवीन नाही मात्र यावर्षी दुष्काळाची भीषणता यापूर्वीच्या दुष्काळापेक्षा तीव्र असल्याच्या भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच यापूर्वी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न फारसा गंभीर नसायचा मात्र यंदा जनावरांना चारा मिळतोय न माणसांना पिण्यासाठी पाणी या दुहेरी कात्रीत सापडलेला बीड जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळला जात आहे.

उंबर विहिरा येथील वस्तुस्थिती..
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील उंबरविहिरा या गावची लोकसंख्या सव्वादोन हजाराच्या जवळपास आहे. या गावात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. मात्र, मागील तीन-चार वर्षापासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळामुळे येथील नागरिकांची मोठी हेळसांड सुरू आहे. गावात दुष्काळ पडला म्हणून सुमारे दीड हजार नागरिकांनी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी कामाच्या शोधात स्थलांतर केले आहे. येथील नागरिकांनी या सगळ्या परिस्थितीबाबत खंत व्यक्त केली. एवढेच नाही तर जिल्हा प्रशासनाकडून रोजगार हमीचे एकही काम या भागात सुरू नसल्याने येथील नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.

आता आडालाही नाही पाणी..
पाटोदा तालुक्यातील उंबरविहिरा येथील एका जून्या झाडाला थोडेबहुत पाणी असायचे. ते पाणी आणि गावातील महिला पोहर्‍याने शेंदून वापरायच्या मात्र तो आडही आटला आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे गावातील महिलांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details