महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमधील सर्व धर्मिय प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली

आजपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. यानुसार औरंगाबादमधील सर्व धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली करण्यात आली आहेत.

By

Published : Nov 16, 2020, 5:29 PM IST

Religious places reopen in Aurangabad city
औरंगाबादमधील मंदिरं खुली न्यूज

औरंगाबाद - राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यास पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर परवानगी देण्यात आली. त्यानंतर सकाळपासूनच सर्वच धार्मिक स्थळ उघडण्यात आली आहेत. औरंगाबादेत असलेले वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर सर्वांसाठी उघडण्यात आले. पहाटे पाच वाजता मंदिरात पुजाऱ्यांनी आरती करून मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले केले.

औरंगाबादमधील सर्व धर्मिय प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली...

वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणून प्रचलित आहे. घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण होत नाही अशी महती आहे. मार्च महिन्यापासून मंदिर बंद होते. राज्य सरकारच्या सूचनेनुसार मंदिर सुरू करण्यात आले असले तरी भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश नसणार आहे. त्याचबरोबर मास्क आणि सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टतर्फे ही माहिती देण्यात आली.
माजी खासदार खैरे यांच्या हस्ते आरती करून भद्रा मारुती मंदिर सुरू
खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते आरती करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. चंद्रकांत खैरे यांनी राज्यात सर्वप्रथम मंदिर खुले करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सरकारने मंदिर खुले करण्याचा निर्णय दिल्याने आनंद झाल्याची भावना चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. सकाळी नऊच्या सुमारास मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. धार्मिक स्थळ उघडताना गाभारा मात्र भक्तांसाठी बंद राहणार आहे. देवाच्या मूर्तीला कोणाचा स्पर्श होऊ नये यासाठी गाभारा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टने दिली आहे.
शहरातील मस्जिद देखील आजपासून सुरू

राज्यातील धार्मिक स्थळ सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर शहरातील मशिद देखील उघडण्यात आल्या. सकाळपासूनच मशिदींची स्वछता, साफ सफाईसह सॅनिटायजेशन पूर्ण करण्यात आले. दिवसातून पाच मुख्य नमाज असतात. प्रत्येक नमाजनंतर मशिदची स्वच्छता करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर दहा वर्षांखालील मुले आणि साठ वर्षांपुढील वृद्धांना मशिद प्रवेश नसेल, त्या बांधवांनी घरीच नमाज पठण करायची आहे, अशी माहिती औरंगाबादच्या नूर मस्जिद प्रमुखांनी दिली.
धार्मिक स्थळ सुरू झाली तरी सगर रद्द
औरंगाबाद जिल्ह्यात गवळी समाज सगर मोठ्या उत्साहात साजरी करतो. सगर म्हणजे भाऊबीजच्या दिवशी आपल्याकडे असणाऱ्या म्हशी आणि रेड्यांची पूजा करून त्यांची मिरवणूक काढली जाते. औरंगाबाद शहरातील राजाबाजार, छावणी आणि बेगमपुरा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली जाते. आजपासून धार्मिक स्थळ सुरू करण्यात आली असली तरी कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी सगरला परवानगी पोलिसांनी नाकारली असल्याने सगरची परंपरा यंदा खंडित झाली आहे.

हेही वाचा -फक्त ग्रीन फटाके विका; औरंगाबादच्या फटाका विक्रेत्यांना दिवाळीच्या एक दिवस नोटीस

हेही वाचा -'विमानात जवळ बसून कोरोना होत नाही, फक्त धार्मिक स्थळांवर कोरोना होतो का?'

ABOUT THE AUTHOR

...view details