महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 22, 2021, 6:05 PM IST

ETV Bharat / state

कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी अधिकाऱ्यांंनी घेतली कोरोनाची लस

लसीकरणाला आरोग्य कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच आरोग्य अधिकाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.

officials took corona vaccine to allay fears among health workers in aurangabd
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी अधिकाऱ्यांनी घेतली कोरोना लस

औरंगाबाद -राज्यात लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. मात्र, या लसीकरणाला आरोग्य कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच आरोग्य अधिकाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य उपसंचालक, महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांचा समावेश होता.

प्रतिनिधीया रिपोर्ट

भीतीमुळे मंदावली लसीकरणाची गती -

मराठवाड्यात 16, 19 आणि 20 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत 11700 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, त्या तुलनेत अवघ्या 7220 जणांनाच लस देण्यात आली. लसीकरणाची नोंद देखील मंदगतीने सुरू आहे. लस टोचून घेण्यासाठी डॉक्टर आरोग्य कर्मचारी फारसे उत्सुक दिसून येत नाहीत, तर काही ठिकाणी लस घेतल्यावर आपल्याला काही आजार होईल, या भीतीने अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी 22 जानेवारी रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेत लस टोचून घेत लसीकरणाबाबत असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाची महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण होईल, असा विश्वास मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी व्यक्त केला.

आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतली लस -

लसीकरण मोहीम सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाईल, अशी घोषणा करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरूदेखील झाली. महानगरपालिका जिल्हा परिषद रुग्णालयासह, खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या लसीकरण मोहिमेसाठी गेल्या दोन महिन्यांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरु होती. प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाल्यावर मात्र सरकारी आणि खाजगी दोन्ही रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. लस घेण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात शंका होती. ही शंका दूर करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धूत हॉस्पिटल येथे जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. ही लस टोचल्यावर कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही, काही प्रमाणात काही लक्षणे हे दिसू शकतात. मात्र, हे सर्वसाधारणपणे ग्राह्य धरूनच लसीकरण केले जाते. त्यामुळे कोणीही घाबरू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

दुसरी लाट अडवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे -

अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट प्रचंड थैमान माजवत आहे. त्यामुळे भारतात सुरू असलेल्या लसीकरणाचा खूप मोठा परिणाम लाटा थोपवण्यासाठी होऊ शकतो. पुढील तीन महिन्यांमध्ये किमान 20 कोटी लोकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्याचवेळी आपण दुसरी लाट आपल्या देशात येण्यापासून थांबवू शकतो. त्यामुळे लसीकरणाबाबत कोणीही मनात भीती न बाळगता लसीकरण हे केले गेले पाहिजे. आरोग्य कर्मचारी असतील किंवा सर्वसामान्य व्यक्ती असेल, त्यांनी लसीकरणामुळे आपल्याला काही तरी अपाय होतील, अशी भीती मनातून काढून टाकायला हवी, असे मत आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लांडे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - जादा व्याज आकारणाऱ्या एनबीएफसीवर कारवाई करा; राज ठाकरेंची आरबीआयकडे मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details