कन्नड (औरंगाबाद) - आद्रक भरलेला ट्रक्टर ब्राह्मणी नदी पार करत असताना ट्रॉली पलटी झाली. ट्रॉलीतील तीस क्विंटलच्या जवळपास आद्रक पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील हिवरखेडा गौतळा येथील शिवदास टिकाराम जाधव यांची गट नंबर ८२ मध्ये शेती असून त्यांनी आपल्या शेतात आद्रकचे पिक घेतले होते.
दिवसभर मजुरांनी आद्रक खोदून ते ट्रॉलीमध्ये भरले होते. आद्रक धुण्यासाठी नियोजित जागी ट्रक्टरद्वारे नेले जात होते. गौतळा अभयारण्यात दुपारी जोरदार पाऊस झाला होता. यामुळे अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाली, त्याच वेळी ट्रॉली पलटी झाल्याने काही उपाय योजना करण्याच्या आतच डोळ्यासमोर आद्रक वाहून गेले. हे दृश्य पाहून शेतकऱ्याचा मुलगा भोवळ येवून जमिनीवर पडला.