औरंगाबाद - जिल्ह्यात टाळेबंदी लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. 30 मार्च ते 8 एप्रिल या काळात अटी-शर्तींनुसार कडकडीत बंद पळाला जाणार आहे.
कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढल्याने घेतला निर्णय
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालले असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत एकंदरीतच जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला होता. त्याच वेळी सुभाष देसाई यांनी जिल्ह्यात टाळेबंदीचे संकेत दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याची स्थिती जाणून घेण्यात आली. शहरातील परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी (दि. 27 मार्च) सायंकाळी टाळेबंदी करण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार 30 मार्चच्या रात्री बारा वाजेपासून ते आठ एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत टाळेबंदी लावण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.