महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 4, 2023, 11:06 PM IST

ETV Bharat / state

Beach Tourism : कोकण किनारपट्टीच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्र कुटी उभारण्याचा सरकारचा निर्णय

राज्य सरकारने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या आठ समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्र कुटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे, गुहागर, रायगडमधील दिवेआगार, वर्सोली आणि पालघर जिल्ह्यातील बोर्डी, केळवा या आठ समुद्रकिनाऱ्यावर समुद्रकुटी (बीच शँक्स) उभारण्यात येणार आहेत.

Beach Tourism
Beach Tourism

मुंबई : राज्यातील कोकण किनारपट्टीला समुद्राने वेढले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आदी आठ समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्र कुटी उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हंगामी, इको फ्रेंडली स्वरूपात कुट्या उभारल्या जाणार असून त्याच्या परवानगीसाठी महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत.


समुद्रकिनाऱ्यावर समुद्रकुटी :कोकणाच्या सौंदर्यकरणात समुद्राने मोठी भर घातली आहे. 120 किलोमीटरचा समुद्रकिनारा कोकण किनारपट्टीला लागला आहे. देश विदेशातील पर्यटना कोकणची किनारपट्टी भुरळ घालत आली आहे. स्वच्छ सुंदर आणि शांतता पूर्व परिसर हा येथील वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. पर्यटनाच्या दृष्टीने ही किनारपट्टी महत्त्वाची आहे. राज्य सरकारने त्यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे, गुहागर, रायगडमधील दिवेआगार, वर्सोली आणि पालघर जिल्ह्यातील बोर्डी, केळवा या आठ समुद्रकिनाऱ्यावर समुद्रकुटी (बीच शँक्स) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आणि पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागांवर या कुट्या उभारण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. या परवानगीसाठी लाभार्थ्यांना 15 हजार रुपयांचा निधी ना परतावा तत्वावर घेण्यात येणार आहे.



रहिवाशांना रोजगाराची संधी :कोकणातील स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक व्यक्तींना यात 80 टक्के जागा राखीव असतील. या कुट्यांचे तीन वर्षाकरिता वाटप केले जाईल. किमान पंधरा फुटाची लांबी आणि रुंदी तसेच बारा फूट उंचीची ही कुटी असणार आहे. प्रत्येक कुटीमध्ये बसण्यासाठी पंधरा ते वीस फूट छत टाकता येईल, अशी व्यवस्था असणार आहे. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत या कुटी सुरू ठेवण्यास मान्यता दिली जाईल.



नियमानुसार या कुटी चालवण्याचे निर्बंध :तीन वर्षाकरिता दिल्या जाणाऱ्या कंत्राट पद्धतीत लाभार्थ्यांना पहिल्या वर्षासाठी 45 हजार, दुसऱ्या वर्षासाठी 50 हजार आणि तिसऱ्या म्हणजे शेवटच्या वर्षासाठी 55 हजार रुपयांचा आर्थिक शुल्क आकारला जाईल. याशिवाय 30 हजार रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. तीन वर्षानंतर सुरक्षा अनामत रक्कम परत करण्यात येईल. राज्य शासनाने घालून दिलेल्या अटी, शर्ती आणि नियमानुसार या कुटी चालवण्याचे निर्बंध असणार आहेत. तसेच प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार असून येथील पर्यटकांच्या गोंधळाचा कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी प्रत्येक कुटी मालकाला घ्यावी लागणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने दिली.

हेही वाचा - Goseva Commission : महाराष्ट्रत गोसेवा आयोगाची स्थापना, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details