अमरावती -अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बापाची मुलगी आणि गवंडी काम करणाऱ्याची पत्नी माधुरी गजभिये (खोब्रागडे)ही महिला जिल्हाधिकारी झाली अशी पोस्ट दोन दिवसापासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यातच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील माधुरी गजभिये(खोब्रागडे)या महिलेच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. परंतु केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१९ च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत माधुरी गजभिये या महिलेच नावच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकू अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर या गावातील सर्वसामान्य कुटूंबातील माधुरी गजभिये (खोब्रागडे )या महिलेने २०१९ मध्ये केंद्रीय सेवा आयोगाची परीक्षा देऊन तिचा देशातून २१४ वा क्रमांक आला असून ती जिल्हाधिकारीपदी नियुक्त झाल्याची पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर या महिलेवर शुभेच्छाचा वर्षाव सुरू झाला होता. सोशल मीडियावर ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरलं झाल्यानंतर या महिलेचे कौतुक सुरू झाले. एवढेच नाहीतर तर थेट राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील या महिलेच्या घरी जाऊन तिचा यशोचित सत्कार देखील केला. सोबतच तळेगावात तिच्या नावाने ग्रंथालय सुरू करण्याची घोषणा देखील केली. मात्र माधुरी गजभिये (खोब्रागडे) या महिलेचे नाव केंद्रीय सेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत नसल्याचं समोर आले आहे.
२०१९ च्या यादीत नावच नाही - २०१९ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत २१४ क्रमांकावर औरंगाबाद येथील सुमित राजेश महाजन हा तरुण उत्तीर्ण झाला असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे माधुरीचा सुद्धा हाच क्रमांक कसा हा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मंत्री यशोमती ठाकुरांनी सोशल मीडियावरून हटवल्या अभिनंदनाच्या पोस्ट -
शुक्रवारी मंत्री यशोमती ठाकुरांनी माधुरी गजभिये या महिलेच्या घरी जाऊन अभिनंदन केले होते. त्यानंतर त्यांनी त्याची माहिती फेसबुक, व्हॉट्सअप आदी सोशल मीडियावर टाकली होती. परंतु आज मात्र त्या सर्व पोस्ट सोशल मीडियावरून हटवण्यात आल्या आहेत.
बॅनर ठेवले गुंढाळून -
माधुरी हिला शुभेच्छा देण्यासाठी गावकऱ्यांनी काही होर्डिंग बॅनर छापून आणले होते. परतू ते बॅनर आता गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. तर आज तिचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. परंतु तो सत्कार देखील आता रद्द करण्यात आला आहे.
मला चुकीची माहिती देण्यात आली -
मी जो सत्कार केला ते चुकीचं असल्याचं ते मला आता कळलं आहे. त्या मुलीने काही चुकीची बातमी केली आम्हला जो कागद दाखवला तो पेपरचा होता. मला समजलं की ती फ्रॉड करत आहे. मी त्याची चौकशी लावली आहे. ती जे २१४ वा क्रमांक सांगते तिथे औरंगाबादचा मुलगा पास झाला आहे. तिला कोणी फसवतंय असं आपल्याला वाटत आहे. त्याची चौकशी पूर्ण झाली की सत्यता बाहेर येईल. आणखी सहा ते सात नाव जाहीर व्हायची आहेत. तिला कुणी फसवत असेल तर तिने पोलिसांत तक्रार द्यायला पाहिजे. दरम्यान माधुरी गजभिये या तरुणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.