अमरावती :जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केवळ एकदाच जिल्ह्यात बैठक घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील कुठल्याही समस्यांची दखल त्यांनी घेतली नाही. अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री बेपत्ता असल्याचा आरोप युवा सेनेचे पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख सागर देशमुख आणि युवा सेना उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांनी केला. आज युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या पालकमंत्री कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली.
पालकमंत्री बदला :राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवले आहे. मात्र त्यांना अमरावती जिल्ह्यात लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यांच्या ह्या अशा कारभारामुळे अमरावती जिल्ह्याचा विकास ठप्प पडला आहे. पालकमंत्र्याचा धाक नसल्यामुळे प्रशासकीय अधिकारी सध्या मजा मारीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत, असा आरोप देखील युवा सेनेच्या वतीने करण्यात आला.
राणा दांम्पत्यावर आरोप :आज जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय विदारक झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सातत्याने आंदोलन करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज गप्प आहेत. राणा दांपत्य आता जिल्ह्यातील परिस्थिती सुधारावी यासाठी हनुमान चालीसा पठण केव्हा करणार असा प्रश्न देखील सागर देशमुख यांनी उपस्थित केला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. विविध प्रश्न उपस्थित करून सरकारवर हल्लोबोल केला.