अकोला - परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची माहिती निरंक पाठवली आहे. त्यामुळे या सरकारला 'सद्बुद्धी दे' अशी नारेबाजी करत वंचित बहुजन आघाडीने आज(शुक्रवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी संबळ व तुणतुणे वाजवले.
वंचितचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांचे यंदा अतिवृष्टीने कंबरडे मोडल्याने त्यांच्या आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. गेल्या हंगामात दुष्काळामुळे जनतेचे हाल झाले. यापूर्वी जूननंतर विदर्भात भरपूर पाऊस पडल्याने शेतीची अपरिमीत हानी झाली. जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिके वाहून गेली डोक्यावर बँकांचे व सावकारांचे कर्ज त्यात हे अस्मानी संकट यामुळे आधीच देशोधडीला लागलेल्या शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
दुबार तिबार पेरणी करूनही हाती काही लागत नसल्याने एकीकडे कर्जाचा आवळला जाणारा फास, तर दुसरीकडे निद्रिस्त सरकारी यंत्रणा, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली नाही. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी विदर्भात येऊन शेतकऱ्यांचे दुःख समजून घेतले नाही. जुने सरकार कायम असताना नवनव्या कर्जामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. सध्या शेतकऱ्यांना गरज आहे ती तत्काळ मदतीची. मात्र, सध्यातरी सरकारी पातळीवर सगळीकडे अनास्थाच दिसून येते. याचा वंचित बहुजन आघाडीने निषेध व्यक्त केला आहे. यावेळी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे, अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रमोद वानखडे आदी उपस्थित होते होते.
हेही वाचा -अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन