महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर : लक्षवेधी लढतीत सुजय की संग्राम मारणार बाजी ? वाढलेल्या मतदानाने उत्सुकता !

अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढला... मतदानानंतर जिल्ह्यात विजयाचे दावे-प्रतिदावे करणाऱ्या चर्चांना उधान...राजकीय विश्लेषकांचा मात्र सावध पवित्रा

By

Published : Apr 25, 2019, 5:18 PM IST

सुजय विखे आणि संग्राम जगताप

अहमदनगर- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिलला मतदान पार पडले. एकूण १८ लाख ५४ हजार मतदारांपैकी ११ लाख ९१ हजार इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सरासरी टक्केवारी ६४.२६ इतकी राहिली. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ६२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे वाढलेले २% हे मतदान कोणासाठी फलदायी ठरणार, हे येत्या २३ मे'ला मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.


जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघापैकी राहुरी मतदार संघात ६६ टक्के सर्वात जास्त मतदान झाले. तर सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर मतदारसंघात ६० टक्के इतके पार पडले. सायंकाळी सहानंतरही काही ठिकाणी मतदानासाठी रांगा दिसून आल्या होत्या आणि त्यामुळेच मतदानाची अंतिम आकडे येण्यासाठी तब्बल २० तासांचा अवधी लागला. एकूण मतदानाचा उत्साह पहिला असता, ज्येष्ठ मतदारांबरोबरच नव्याने मतदार यादीत समावेश झालेल्या नवमतदारांचा उत्साह सकाळीच दिसून आला. अनेक नवमतदारांनी रांगेत उभे राहून उत्साहाने आपले मतदान ओळखपत्र दाखवत मतदानाचा हक्क बजावत असल्याचा आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर जिल्ह्यात असलेल्या दहा सखी मतदान केंद्रावर ही वेगळाच उत्साह दिसून येत होता. या ठिकाणची आकर्षक पद्धतीने केलेली सजावट हा एक चर्चेचा विषय झाला होता.


ईव्हीएम बंद पडत असल्याने मतदारांमध्ये नाराजी-


कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने संपूर्ण जिल्हा व संपूर्ण मतदारसंघात सुसज्ज अशी यंत्रणा उभी केल्याने किरकोळ काही प्रकार वगळता सर्वत्र शांततेत आणि निर्भय वातावरणात मतदान पडल्याचे दिसून आले. एक प्रकारे पोलीस प्रशासनाच्या चांगल्या नियोजनाचे हे यश म्हणावे लागेल. मात्र अनेक ठिकाणी मतदान यंत्र बंद पडत असल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून आली. एकच मतदान यंत्र दोन ते तीन वेळेस बंद पडत असल्याने अशा मतदान केंद्रावर बाहेर लांबच लांब रांगा दिसून आल्या. त्यामुळे काही मतदारांनी मतदान न करता काढता पाय घेतल्याचेही समोर आले.


जिल्ह्यात एकूण मतदान पाहिल्यास मतदानानंतर विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. डॉ. सुजय विखे आणि जगताप या दोन प्रमुख उमेदवारांच्या समर्थकांकडून आपलाच उमेदवार निवडून येणार असा दृढ विश्वास प्रत्येक पारावर व्यक्त होत आहे. मात्र, सर्वसामान्य जनता कोण निवडून येणार याबद्दल सावध भूमिकेत आहे. या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघ निहाय पाहिल्यास..

१) नगर शहर-
- नगर शहरामध्ये एकीकडे आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी असतानाच शिवसेना आणि भाजपने एक दिलाने काम करत प्रचाराच्या काळात मोठा उत्साह दाखवला. याठिकाणी कौल नेमका कोणाकडे गेला याबद्दल ही उत्सुकता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक हे शहरात प्रचार न करता त्यांना इतर पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली होती. त्यामुळे त्यांचे आपल्या प्रभागात दर्शन झाले नाही. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपचे नगरसेवकही तेवढ्या प्रमाणात आपल्या प्रभागात सुजय विखे यांचा प्रसार करताना दिसून आले नाहीत. मात्र, दोन्ही पक्षाचे नगरसेवक हे आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबर प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसून आले हे पण म्हत्वाचे. शहरामध्ये गेल्या वेळेस ५५ टक्के मतदान झाले होते. यावेळेस ही आकडेवारी वाढलेली दिसून येत असून साठ टक्केपर्यंत मतदान गेले आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदान कुणाच्या पारड्यात जाणार याबद्दलही मतमतांतरे आहेत.

२)पारनेर-
पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले निलेश लंके यांच्या प्रचारातील आघाडीमुळे पारनेर मतदारसंघातही कोण आघाडी घेणार याबद्दल उत्सुकता आहे. पारनेरमध्ये शिवसेनेचे आमदार विजय औटी आहेत. त्यांचा या मतदारसंघावर चांगले वर्चस्व आहे. मात्र निलेश लंके, सुजित झावरे, उदय शेळके या फळीने राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्यासाठी मोठी 'फिल्डिंग' लावलेल्याने या ठिकाणाहून आघाडी कोण घेणार, त्याचबरोबर विधानसभेसाठी निलेश लंके यांना हा मतदारसंघ किती अनुकूल आहे याचे चित्र मतमोजणीनंतर समोर येणार आहे.

३) श्रीगोंदा-
श्रीगोंदा मतदारसंघामध्ये बबनराव पाचपुते यांचे नेहमीच वर्चस्व राहिलेला आहे. मात्र २०१४ सली शरद पवारांनी राहुल जगताप यांना मैदानात उतरवत पाचपुते विरोधकांची मोट बांधली, त्यात नागवडे गटाने शरद पवारांना साथ देत राहुल जगताप यांच्या विजयात मोठा वाटा उचलला. आता हीच परिस्थिती लोकसभा निवडणुकीतही असून राहुल जगताप यांच्या सोबत राजेंद्र नागवडे, बाबासाहेब अशी मंडळी असल्याने त्यामध्ये राष्ट्रवादी तुलनात्मक चांगल्या परिस्थितीत दिसून येत आहे. त्याचबरोबर बबनराव पाचपुते यांनीही मतदारसंघात जोरदार प्रचार केल्याने आणि त्यांच्यासोबत बाळासाहेब नाहाटा अण्णासाहेब शेलार आदी मंडळी असल्याने या ठिकाणाहून नेमकं मताधिक्य कुणाकडे येणार याबद्दल आज सांगणं अवघड आहे.

४) राहुरी-
राहुरी मतदारसंघामध्ये तनपुरे कुटुंबाचे मोठे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी या मतदारसंघात जोरदार प्रचार केला आहे. त्याचबरोबर भाजपचे आमदार असलेले शिवाजी कर्डिले यांचेही मोठे वर्चस्व आहे. मात्र कर्डिले यांचे जावई राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेमकं कुणाचं काम केलं याबद्दल गूढ चर्चा सुरू आहे. वास्तविक शिवाजी कर्डिले यांनी वारंवार आपण भारतीय जनता पक्षाचे काम करणार असून सुजय विखे यांना जिल्ह्यात सर्वात मोठे मताधिक्य आपल्या राहुरी मतदार संघातून देऊन असं सांगितलं आहे. तरीही आता मतदानानंतर कर्डिले यांच्या याबद्दल वेग वेगळ्या चर्चा झडत आहेत. मात्र याचेही उत्तर २३ मे ला मिळणार आहे.

५) पाथर्डी-
पाथर्डी शेवगाव मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून सुजय विखे आघाडी मिळेल असेच बोलले जात आहे. मात्र, या मतदारसंघातील शेवगाव तालुक्यातील माजी आमदार घुले बंधू यांनीही, त्याचबरोबर शिवाजी काकडे आणि प्रताप ढाकणे यांनी पाथर्डी तालुक्यामध्ये संग्राम जगताप यांच्यासाठी प्रचारात आघाडी घेतली होती. त्यामुळे शेवगाव-पाथर्डीमधून त्यांना चांगले मतदान होईल, असे बोलले जात आहे. मात्र तरीही या ठिकाणी मतदानात आघाडी भाजपची होऊ शकते, अशी एकंदरीत चर्चा आहे.

६) कर्जत-जामखेड-
पालकमंत्री राम शिंदे यांचा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणाहून भाजप विखे यांना आघाडी देईल, असे एकंदरीत चित्र आहे. तरीही राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी या मतदारसंघात या अगोदरच पूर्ण लक्ष घातलेले असल्याने राष्ट्रवादीही काही चमत्कार या मतदारसंघात घडून आणू शकते असं बोलले जात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मराठा समाजाने मतदान एक गठ्ठा राष्ट्रवादीला केल्याची चर्चा ही होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या आकडेवारीकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे राम शिंदे यांना विधानसभेसाठी हा मतदारसंघ आता किती सुरक्षित आहे, याचे चित्रही २३ मे ला स्पष्ट होणार आहे.


एकूणच पाहिले तर युतीचे डॉ. सुजय विखे आणि आघाडीचे आमदार संग्राम जगताप यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार राबवत विजयासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, मतदार राजाने मतदानाच्या अधिकारातून आपले मत ईव्हीएम यंत्रामध्ये आता बंद केले आहे. या मतदानाची एकूणच गोळाबेरीज येत्या २३ मे'ला होणार असून त्यानंतरच सुजय दादा की संग्राम भैय्या याबद्दलच मतदारांनी दिलेला कौल स्पष्ट होणार आहे..

ABOUT THE AUTHOR

...view details