अहमदनगर- राज्यात सेना-भाजप युतीसरकार स्थापनेवरुन तणाव निर्माण झाला असतानाच अहमदनगर जिल्ह्यातही रस्ते दुरुस्ती प्रश्नावरुन शिवसेना आणि भाजपच्या खासदारांमध्ये वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील खड्डे बुजवलेले नाही. त्यामुळे टोल वसुली सुरू करू नये, अशी मागणी शिवसेना खासदारांची होती. यावर भाजपचे खासदार सुजय विखेंनी टोल वसुल करण्याचा आदेश देत जनभावना दुखविल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडेंनी केला आहे.
भाजपच्या खासदारांनी टोल वसुलीचे आदेश दिल्याने जनभावना दुखावल्या - खासदार लोखंडे
अहमदनगर-मनमाड रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून ते न बुजविता टोल सुरू करण्याचे आदेश भाजपचे खासदार सुजय विखेंनी दिल्याने जनभावना दुखावल्याचा आरोप सेनेचे खासदार सदाशिव लोखंडेंनी केला आहे.
अहमदनगर मनमाड महामार्गावरील रस्त्यावर खड्डे पडल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जाव लागत आहे. या विरोधात शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली चार दिवसांपूर्वी आंदोलन करत टोल नाका बंद करण्यात आला होता. रस्ता दुरुस्ती करुनच टोल वसुली करावी, अशी मागणी खासदारांनी केली होती. त्यानंतर ठेकेदार कंपनीने काही ठिकाणचे खड्डे बुजविण्यास सुरुवात करत पुन्हा टोल वसुली सुरु केली. या ठेकेदारास टोल वसुली करण्यास अहमदनगर लोकसभेचे खासदार सुजय विखे यांनी सांगीतल्याचा आरोप शिवसेना खासदारांनी केला आहे. रस्त्यावरचे खड्डे न बुजवता टोल वसुली सुरू केली गेली आहे. हा जनभावनेचा अनादर असल्याने खासदार लोखंडे यांनी संताप व्यक्त करत शिर्डी जवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावत गांधीगीरी आंदोलन केले.
हेही वाचा - अहमदनगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे शिवसेनेने टोल नाक्याला ठोकले टाळे