अहमदनगर- मी माझ्यासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण आंदोलनासाठी जागा मागतोय, पण मी आंदोलन करतोय, म्हणून तुम्ही माझ्याशी सूडबुद्धीने वागत असाल, तर २०११ च्या आंदोलनानंतर जनतेने तत्कालीन काँग्रेस सरकारला शिकवला, तसा धडा तुम्हालाही शिकवेल, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
उपोषण करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार-
हजारे यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवर आधारित कृषी मागण्यांवर दोन वेळेस आंदोलन केली असून सरकारने त्यांना आश्वासन पूर्ती करण्याचे लेखी दिले आहे. मात्र, दोन वर्षे उलटल्यानंतरही सरकार आश्वासनपूर्ती करत नसल्याबद्दल अण्णांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीस दिल्लीत रामलीला मैदानावर उपोषण आंदोलनासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. मात्र, एकीकडे आश्वासन पूर्ण होत नसताना त्यांना आंदोलनासाठी रामलीला मैदान व्यवस्थापनाने अजून परवानगी दिलेली नाही. यामुळे अण्णा आता सरकारवर संतापले असून मी आंदोलन करतोय, म्हणून सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप केला आहे. एका फकीर माणसाशी असे वागणे सरकारला शोभत नाही. शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन, उपोषण करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार असल्याचे अण्णा म्हणतात.
सूडबुद्धीने वागलेल्या काँग्रेसला त्यावेळी पायउतार व्हावे लागले-
हा आरोप करताना अण्णांनी 2011 साली काँग्रेस सरकारच्या काळातील आंदोलनाची आठवण करून देताना तेव्हाचे सरकारही माझ्याशी सूडबुद्धीने वागले आणि मला आंदोलनाला जागा न देता तिहार जेलमध्ये टाकले. मात्र, जनतेने त्यांना धडा शिकवला आणि त्या सरकारला जावे लागले. आता तुम्हीही तसेच वागणार असाल आणि आपले कोणी काही करू शकत नाही, असे जरी तुम्हाला वाटत असले तरी लोकशाहीत मतदार हा राजा आहे, त्याने मनात आणले तर तो तुम्हालाही धडा शिकवेल, असा गर्भित इशारा अण्णांनी मोदी सरकारला दिला आहे. काहीही झाले तरी या महिन्याच्या अखेरीस दिल्लीत मिळेल त्या जागेवर आपण आंदोलन करणारच, असे ठामपणे अण्णांनी सांगितले आहे.