महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर : राजकीय वादातून निवृत्त सैनिकाने केलेल्या गोळीबारात सरपंच ठार, नांदूर निंबादैत्य गावातील घटना

पाथर्डी तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदूर निंबादैत्य या गावात राजकीय वादातून माजी सैनिकाने सरपंचाला गोळ्या घातल्या. यात सरपंचाचा मृत्यू झाला असून यावेळी झालेल्या हाणामारीत तिघे जखमी झाले आहेत.

By

Published : Dec 18, 2019, 4:36 AM IST

मृत संजय दहिफळे
मृत संजय दहिफळे

अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदूर निंबादैत्य या गावात राजकीय वादातून दोन गटांत झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 17 डिसें) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.


या घटनेतील जखमींना अत्यवस्थेत अहमदनगरला उपचारासाठी हलविण्यात आले असून या घटनेत ज्ञानेश्वर अशोक दहिफळे (वय 30 वर्षे) हे गंभीर जखमी झाले आहेत. भीमराज जिजाबा दहिफळे (वय 60 वर्षे), सदाशिव अर्जुन दहिफळे (वय 50 वर्षे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.


या घटनेतील मृत सरपंच संजय दहिफळे यांचे गावातीलच निवृत्त जवान शहादेव उर्फ पम्प्या पंढरीनाथ दहिफळे यांच्याशी राजकीय वैर होते. या दोघांमध्ये पूर्वी अनेकवेळा वाद झाले होते. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावातीलच स्व. गोपीनाथ मुंडे चौकात दोन्ही गटांत हाणामारी झाली. त्यात निवृत्त सैनिक शहादेव दहिफळे याने आपल्याकडे असलेल्या रिवॉल्व्हरमधून सरपंच संजय दहिफळे यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या.

हेही वाचा - साईबाबाच्या दारात पत्नी गायब; दोन वर्षे उलटले तरी शिर्डी पोलिसांचा तपास ढिम्म


यावेळी झालेल्या हाणामारीत सरपंच संजय दहिफळे यांच्या गटाचे ज्ञानेश्वर दहिफळे यांच्या डोक्याला जबर मार लागला तर भीमराज दहिफळे व सदाशिव दहिफळे यांना किरकोळ मार लागला. सर्व जखमींना गावातीलच काही तरुणांनी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा - खळबळजनक! शिर्डीत 10 महिन्यात तब्बल 88 भाविक बेपत्ता; मानवी तस्करीचा संशय


वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद गर्जे यांनी संजय दहिफळे व ज्ञानेश्वर दहिफळे यांच्यावर प्रथमोचार करून पुढील नगरला उपचारासाठी पाठवले. दरम्यान, सरपंच संजय दहिफळे यांचा मृत्यू झाला. या घटनेने नांदूर निंबादैत्य येथे तणावपूर्ण वातावरण असून घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी घटनास्थळी दाखल झाले. आरोपीस रात्री उशीरापर्यंत अटक केली नव्हती.

हेही वाचा - अहमदनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details