महाराष्ट्र

maharashtra

नगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; कोल्हापुरात फुटणार युतीचा नारळ, तर बीडमध्ये पंकजांचा मेटेंना झटका

By

Published : Mar 24, 2019, 11:25 AM IST

Updated : Mar 24, 2019, 1:03 PM IST

नगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; कोल्हापुरात फुटणार युतीचा नारळ...मोहिते पाटील हे मोडीत निघालेले भांडे, शरद पवारांनी कल्हई करून १० वर्षे जगवले - संजय शिंदेची टीका.. यासारख्या अनेक राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा वाचा थोडक्यात

नगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग

लोकसभा २०१९: काँग्रेसची ८ वी यादी जाहीर, अशोक चव्हाण नांदेडमधून लढणार

नवी दिल्ली - काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची ८ वी यादी जाहीर केली आहे. यात कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे. मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकातील गुलबर्गा, दिग्विजय सिंह मध्य प्रदेशातील भोपाळ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधून निवडणूक लढवतील.

अहमदनगर दक्षिणमध्ये राजकीय घडामोडींना वेग; गांधी-थोरातांच्या भूमिका आज होणार स्पष्ट

अहमदनगर- लोकसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजचा दिवस नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांसाठी राजकीय भूमिकावार ठरणार आहे. आज एकीकडे युती-आघाडीने आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलावून घटकपक्ष, नेते-कार्यकर्त्यांचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे भाजप विद्यमान खासदार दिलीप गांधी समर्थकांनीही निष्ठावंताचा एक मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात खा. गांधी आणि त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. वाचा सविस्तर

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, भाजप प्रवेश करणार


मुंबई : लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार का याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

कोल्हापुरात युतीच्या प्रचार आज फुटणार नारळ


कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ आज (रविवार) कोल्हापुरात फुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता कोल्हापुरातील तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार असून, याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास अडीच लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

जय सिद्धेश्वर ठरतील का सोलापूरचे 'योगी'? भाजप राबवू पाहतोय युपी पॅटर्न

सोलापूर - भारतीय जनता पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लिंगायत धर्मगुरू डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत भाजपने देशभरात अनेक अध्यात्मिक धर्मगुरुंना संसदेत पाठवले आहे. उत्तर प्रदेशात तर योगी आदित्यनाथ थेट मुख्यमंत्रीपदी बसले आहेत. सोलापुरात देखील भाजप हाच युपी पॅटर्न राबवत असल्याचे बोलले जात आहे. हा पॅटर्न यशस्वी होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल.वाचा सविस्तर

तिढा सांगलीचा : सोशल मीडियावर एकच प्रश्न, झालं का फायनल?

सांगली- लोकसभेच्या काँगेस उमेदवारीच्या वादानंतर निर्माण झालेला जागेचा प्रश्न मिटता-मिटेना. स्वाभिमानाच्या वाट्याला जागा जाणार की? काँग्रेसचा उमेदवार मैदानात उतरणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या उत्सुकतेपोटी सोशल मीडियावर फक्त 'फायनल झालं का' अशी चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीपासून भाजपच्या नव्हे तर सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला काँग्रेसला जागा मिळणार की, स्वाभिमानीला? आणि मिळाल्यास उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.वाचा सविस्तर

राज्यातील सर्वात मोठी माथाडी कामगार संघटना फुटीच्या वाटेवर?

मुंबई- माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त शनिवारी नवी मुंबईत दरवर्षी प्रमाणे माथाडी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या मेळाव्याला शनिवारी एकाही पक्षाच्या मोठ्या नेत्यांना बोलाविण्यात आले नाही. दरवर्षी शरद पवार किंवा मुख्यमंत्र्यांना आवर्जून बोलावले जायचे. पण, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या वारंवार पक्ष बदलामुळे कोणत्या नेत्यांना बोलवायचे याबाबत गोची झाल्याने प्रथमच माथाडी मेळाव्याला कोणीही मोठे नेते उपस्थित नव्हते.वाचा सविस्तर

वंचित बहुजन आघाडी भाजपची 'बी' टीम; अजित पवारांचा प्रकाश आंबेडकरांना टोला

मुंबई - देशाच्या हितासाठी आम्ही काही पक्षांना महाआघाडीत सामावून घेऊ इच्छित होता. त्यासाठी आम्ही प्रयत्नही केले. मात्र, तथ्यहीन कारणे देऊन आघाडी होऊ नये, यासाठी भाजपची बी-टीम कार्यरत होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नाव न घेता लगावला. ते आघाडीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.वाचा सविस्तर

मोहिते पाटील हे मोडीत निघालेले भांडे, शरद पवारांनी कल्हई करून १० वर्षे जगवले - संजय शिंदे

सोलापूर- 'मोहिते पाटील म्हणजे १० वर्षांपूर्वीच मोडीत निघालेले भांडे आहे. या मोडीत निघालेल्या भांड्याला शरद पवार यांनी कल्हई करून करून ते जिवंत ठेवले. त्यामुळेच मोहिते पाटील हे आजपर्यंत टिकले,' अशी टीका माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी केली आहे. 'जनतेने मोहिते पाटलांचा पराभव केल्यावरदेखील पवारांनी त्यांना पदे दिली. तरीही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे ते म्हणत आहेत. ते कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी नव्हे; तर, स्वतःच्या कुटुंबाच्या स्थिरीकरणासाठी भाजपात गेले,' अशी टीका संजय शिंदेंनी केली.वाचा सविस्तर

नागपूरमधून ९ तर रामटेकमधून दोघांनी भरले उमेदवारी अर्ज; प्रमुख दावेदारांचे अर्ज सोमवारी

नागपूर- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा अर्ज सादर करण्याकरता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आतापर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात ९ उमेदवारांनी अर्ज सादर केला आहे, तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून केवळ २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अजूनही उमेदवारी अर्ज सादर केलेला नाही.वाचा सविस्तर

भाजपचे खासदार गायकवाड नाराज; म्हणाले 'ही' माझी चूक झाली

लातूर- लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार सुनिल गायकवाड यांना उमेदवारी डावलून जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या आदेशाने काम करणार असल्याचे खासदार गायकवाड यांनी स्पष्ट केले असले तरी, त्यांची नाराजी आता लपून राहिलेली नाही. खासदार असताना मी माझा स्वतंत्र असा गटच केला नाही. मी केवळ पक्षाचेच काम करीत असल्याचे सांगत त्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीचा कसा फटका बसला हेच अप्रत्यक्ष सांगितले आहे.वाचा सविस्तर

पंकजा मुंडेंचा विनायक मेटेंना धक्का; शिवसंग्रामचे दोन झेडपी सदस्य भाजपमध्ये

बीड- युती सरकारमध्ये मित्रपक्ष अससेले शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांना मंत्री पंकजा मुंडेंनी झटका दिला आहे. शिवसंग्रामच्या तिकिटावर निवडून आलेले अशोक लोढा व विजयकांत मुंडे हे दोन जिल्हा परिषद सदस्य शनिवारी रात्री उशिरा भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शिवसंग्राम राज्यात भाजपसोबत असेल मात्र, जिल्ह्यात भाजपला सहकार्य करणार नाही' अशी भूमिका विनायक मेटे यांनी घेतली होती. त्यानंतर शिवसंग्रामचे कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर जाऊ लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर

नवनीत राणासाठी पदाधिकाऱ्यांचे मंदिरात साकडे; आर्वी ते अमरावती पायदळ वारी

वर्धा- सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अशातच आपल्या नेत्यासाठी कार्यकर्ते नवनवीन भन्नाट संकल्पनांचा वापर करताना दिसून येत आहेत. अशाच प्रकारे आर्वीतील युवा स्वाभिमानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क मंदिरात जाऊन साकडे घातले आहे. या कार्यकर्त्यांनी अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी आर्वी ते अमरावतीपर्यंत चक्क पायदळ वारी काढत एकवीरा देवीला साकडे घातले आहे. वाचा सविस्तर

विधानसभेत मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देण्याचे मुख्यमंत्र्याचे आश्वासन - महादेव जानकर

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मित्रपक्षांना एकही जागा दिलेली नाही. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगाल्यावर महादेव जानकर, रिपाइंचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची बैठक पार पडली. यावेळी घटकपक्षांवर अन्याय होणार नाही. त्यांना योग्य तो सन्मान आणि भागीदारी दिली जाईल. मात्र, विधानसभेत मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. वाचा सविस्तर

Last Updated : Mar 24, 2019, 1:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details