अहमदनगर - जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जागा करता झालेल्या निवडणुकीत एका जागेवर अपेक्षित निकाल आला नाही, हे दुर्दैवाने घडले. शेतकरी व बँकेच्या हिताकरिता राजकारण विरहित निवडणूक करण्यासाठी आपण पुढाकार घेतला असून बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार आहोत, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
बँकेची निवडणूक राजकारण विरहित-
जिल्हा सहकारी बँकेच्या निकालानंतर रविवारी महसूल मंत्री थोरात यांनी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळेस थोरात म्हणाले की, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक महाराष्ट्रातील आदर्श बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून साखर कारखान्यांना कर्जाच्या रुपाने मदत होत असते. शेतकर्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज देण्याचा अभिनव उपक्रम या बँकेने केला आहे. या बँकेचे महत्व अहमदनगर जिल्ह्यासाठी, सहकारासाठी आणि शेतकर्यांसाठी अनन्यसाधारण असून या बँकेची निवडणूक राजकारण विरहित केलेली आहे.