अहमदनगर - मागील वर्षीही राज्यात कोरोनाचा प्रभाव होता. मात्र, तो ओसल्यानंतर शहर आणि ग्रामीण भागातील सभा-समारंभ आणि नागरिकांच्या अतिउत्साहमुळे कोरोनाची दुसरी लाट आली, असे मत नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यादृष्टीने नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊनचे नियम पाळल्यास आपण या लाटेला तोंड देऊ शकू, असेही मुश्रीफ म्हणाले.
आज (१ मे) महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्ताने जिल्ह्यातील आणि राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.