महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 15, 2021, 1:17 PM IST

ETV Bharat / sports

IPL २०२१ : बाद झाल्यानंतर संतापलेल्या विराटने बॅटने उडवली खुर्ची, झाली शिक्षा

सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विराट २९ चेंडूत अवघ्या ३३ धावा केल्यानंतर बाद झाला. त्यामुळे संतापलेल्या विराटने पॅव्हेलियनकडे परतताना बंगळुरूच्या डगआऊटमध्ये असलेली खुर्ची बॅटने उडवली. विराटच्या या कृत्याची दखल मॅच रेफरींनी घेतली. त्यांनी विराटला आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी ठरवले आहे.

IPL 2021 SRH vs RCB  : Virat Kohli Reprimanded For IPL Code Of Conduct Breach
IPL २०२१ : बाद झाल्यानंतर संतापलेल्या विराटने बॅटने उडवली खुर्ची, झाली ही शिक्षा

चेन्नई - आयपीएल २०२१ मधील सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सनरायजर्स हैदराबादचा ६ धावांनी पराभव केला. पण या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुमकडे परतताना विराटने आपला राग खुर्चीवर काढला. या प्रकणात आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल विराटला फटकारण्यात आले आहे.

नेमके काय आहे प्रकरण -

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात बुधवारी सामना रंगला होता. या सामन्यात विराट २९ चेंडूत अवघ्या ३३ धावा केल्यानंतर बाद झाला. त्यामुळे संतापलेल्या विराटने पॅव्हेलियनकडे परतताना बंगळुरूच्या डगआऊटमध्ये असलेली खुर्ची बॅटने उडवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील क्रिकेटपटूही त्याच्याकडे पाहत राहिले.

विराटच्या या कृत्याची दखल मॅच रेफरींनी घेतली. त्यांनी विराटला आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. विराटला आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल १ गुन्हा २.२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या नियमांतर्गत क्रिकेट उपकरणांशिवाय मैदानातील साहित्याचं नुकसान करणं अशा बाबींचा समावेश होतो.

आयपीएलने एका निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली. यात त्यांनी, विराट कोहलीने आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल १ गुन्हा २.२ चे उल्लंघन केल्याचे कबूल केले आहे. आचारसंहितेच्या लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी सामन्याच्या रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे, असे म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणात विराटच्या मानधनातील १५ टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार आहे.

हैदराबादला पराभूत करत विराट सेनेने या मोसमातील सलग दुसरा विजय साकारला. याआधी बंगळुरुने या मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्यामुळे बंगळुरुला पुढील सामना जिंकत विजयाची हॅटट्रिक लगावण्याची संधी आहे.

हेही वाचा -SRH Vs RCB : रॉयल चॅलेंजर्सचा सलग दुसरा विजय; 6 धावांनी हैदराबादला चारली धूळ

हेही वाचा -RCB VS SRH : १७ व्या षटकात सामना फिरला, ३ चेंडूमुळे हैदराबादचा घात झाला

ABOUT THE AUTHOR

...view details