महाराष्ट्र

maharashtra

जातिवादी टिप्पणी केल्याप्रकरणी युवराज सिंगला अटक अन् सुटका, नक्की कारण काय?

By

Published : Oct 18, 2021, 7:16 AM IST

क्रिकेटपटू युवराज सिंगला जातिवादी टिप्पणी केल्याप्रकरणी अटक झाली होती. मात्र, अटकेच्या काही वेळातच युवराजला जामीन मिळाला. ही अटक 2019 च्या एका प्रकरणात करण्यात आली होती.

Former Indian cricketer Yuvraj Singh
क्रिकेटपटू युवराज सिंग

मुंबई - टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि 'सिक्सर किंग' नावाने ओळखला जाणारा क्रिकेटपटू युवराज सिंगला जातिवादी टिप्पणी केल्याप्रकरणी अटक झाली होती. मात्र, अटकेच्या काही वेळातच युवराजला जामीन मिळाला. ही अटक 2019 च्या एका प्रकरणात करण्यात आली होती.

हांसी पोलिसांनी शनिवारी युवराज सिंगला चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर युवराजचा जवाब नोंदवून घेण्यात आला. त्यानंतर युवराजला अटक करण्यात आली. अटकेनंतर थोड्याच वेळात युवराजला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जामीन मिळाला.

काय आहे प्रकरण -

युवराज रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ चॅट करत होता. यात त्याने मस्करीत युझवेंद्र चहलविरोधी जातीवाचक शेरेबाजी केली. त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी मानवी हक्क संस्थेचे समन्वयक रजत कलसनने गेल्या वर्षी 2 जूनला गुन्हा दाखल केल्यानंतर अटकेची मागणी केली होती. युवराजवर IPC च्या कलम 153, 153A, 295, 505 सह SC / ST कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली.

युवराजचा माफीनामा -

युवीच्या त्या विधानाविरोधात सोशल मीडियावर 'युवराज सिंग माफी माग' असा ट्रेंडही व्हायरल झाला होता. यानंतर युवीने आपली बाजू मांडली. ''माझा कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास नाही. धर्म, रंग, पंथ किंवा लिंग यावरून मी कधीच भेदभाव करत नाही. लोकांचे कल्याण करण्यासाठी मी झटत आलो आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा मी आदर राखतो. मला जातीवाचक टीका टिप्पणी करण्यात काहीही रस नाही. रोहितशी झालेल्या त्या संवादादरम्यान माझ्या शब्दांचा उलट अर्थ काढण्यात आला. परंतु माझ्या या कृत्यामुळे चहलव्यतिरिक्त अन्य कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो'', अशा शब्दात युवराजने जाहीर माफी मागितली होती.

युवराज आणि क्रिकेट -

12 डिसेंबर 1981 रोजी चंदीगढमध्ये युवराजचा जन्म झाला. टी-20 क्रिकेटमध्ये सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याचा विक्रम युवीच्या नावे आहे. युवीने टी-20 क्रिकेटमध्ये तर आपली छाप सोडलीच पण त्याआधी त्याने एकदिवसीय सामन्यात अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. युवराजने भारताकडून 304 एकदिवसीय सामने, 40 कसोटी आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 8701, 1900, 1177 धावा केल्या आहेत.

हेही वाचा -42 व्या वाढदिवशी युवीसोबत थिरकला ख्रिस गेल

ABOUT THE AUTHOR

...view details