महाराष्ट्र

maharashtra

IPL २०२० : एका धडकेमुळे 'सनरायझर्स'च्या हातून सामना निसटला; पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 22, 2020, 4:06 PM IST

रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात ५ विकेट पडल्यानंतर राशिद खान आणि अभिषेक शर्मा यांनी सनरायझर्स हैदराबादकडून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण एका भयंकर धडकेत अभिषेक शर्मा धावबाद झाल्याने हैदराबाद संघाच्या विजयाच्या आशा संपल्या.

IPL २०२० : एका धडकेमुळे 'सनरायझर्स'च्या हातून सामना निसटला; पाहा व्हिडीओ
IPL २०२० : एका धडकेमुळे 'सनरायझर्स'च्या हातून सामना निसटला; पाहा व्हिडीओ

दुबई - आयपीएल २०२०च्या तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. यात आरसीबीने बाजी मारली. विराटच्या संघाने हा सामना १० धावांनी जिंकला. हैदराबादच्या बेअरस्टो आणि मनिष पांडे या जोडीने आश्वासक भागीदारी करत संघाला विजयपथावर आणून ठेवले होते. बेअरस्टोने फटकेबाजी करत अर्धशतकही झळकावले. मात्र ही जोडी बाद झाल्यानंतर हैदराबादचा डाव गडगडला. सामन्यात ५ विकेट पडल्यानंतर राशिद खान आणि अभिषेक शर्मा यांनी सनरायझर्स हैदराबादकडून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण एका भयंकर धडकेत अभिषेक शर्मा धावबाद झाल्याने संघाच्या आशा संपल्या. त्यात अखेरच्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी केली याचा फटका हैदराबादला बसला.

काय घडलं?

युजवेंद्र चहलने एकाच षटकात बेअरस्टो आणि विजय शंकर यांना माघारी धाडत सामन्याचे पारडे आरसीबीच्या दिशेने झुकवले. त्यानंतर प्रियम गर्गही आल्या पावले माघारी परतला. तेव्हा राशिद खान आणि अभिषेक शर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. राशिदने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे अभिषेक शर्मालाही सूर गवसला होता.

शिवम दुबेच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने एक फटका खेळला. यावेळी दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या राशिद खानने एक धाव पूर्ण केली. मात्र दुसरी धाव घेण्यासाठी परत येत असताना दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ दिसला नाही. धाव पूर्ण करण्याच्या नादात दोन्ही फलंदाजांची जोरात टक्कर झाली. त्यावेळी चेंडू उमेश यादवच्या हातात होता. त्याने त्वरित यष्टीरक्षक जोश फिलिपकडे फेकला आणि अभिषेकला सहज धावबाद केले. या एका अपघाताचा फटका हैदराबादलाच बसला. कारण ही जोडी मैदानात असताना हैदराबादला विजयासाठी अवघ्या ३० धावांची गरज होती.

दरम्यान, राशिद खान सुमारे ५ मिनिटे पीचवर पडून राहिला. फिजिओने येऊन राशिदला उभे केले. राशिदने पुन्हा फलंदाजीस सुरूवात केली. पण अभिषेकची विकेट पडल्यानंतर हैदराबाद बॅकफूटवर आला होता आणि आरसीबी गोलंदाजांनी पुढचा मार्ग सुकर केला आणि हा सामना १० धावांनी जिंकला.

ABOUT THE AUTHOR

...view details