नवी मुंबई - दुबईत स्थानिक टी-२० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील १८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा संपल्यानंतर हे खेळाडू मायदेशी परतले. तेव्हा कोरोना संशयित म्हणून त्यांना १४ दिवस पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयातील ग्रामविकास भवनमध्ये निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार होते. पण त्या खेळाडूंनी ग्रामविकास भवनमध्ये राहण्यास नकार देत रुग्णालयातून पळ काढला. यामुळे खळबळ उडाली.
घडले असे की, दुबईतून १८ खेळाडू भारतात परतले. तेव्हा त्यांना विमानतळावरुन पनवेल महापालिकेच्या बस तसेच रुग्णवाहिकेतून थेट पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची व्यवस्था टीव्ही, वाय-फाय तसेच इतर मनोरंजनाची साधनांनी सुसह्य अशा ग्रामविकास भवनात करण्यात आली होती. तसेच त्यांची कोरोनाची चाचणीही घेण्यात आली. मात्र, रिपोर्ट येण्याआधीच त्या खेळाडूंनी ग्रामविकास भवनातून पळ काढला.
रुग्णालय प्रशासनाने खेळाडूंना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते खेळाडू प्रशासनाला जुमानले नाहीत. अखेर त्यांनी रुग्णालय सोडले. तेव्हा रुग्णालय प्रशासनाने याची माहिती पोलीस प्रशासनाला दिली.