मुंबई- कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत ६ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरात जणू या विषाणूच्या दहशतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर कोरोना विषाणूला जगभरात परसलेला साथीचा आजार म्हणून घोषित केलं आहे. भारतातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. बीसीसीआयने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेत आपल्या मुंबईच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मूभा दिली आहे.
कोरोना विषाणूचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. या विषाणूच्या भीतीने जगभरातील अनेक स्पर्धा रद्द तसेच काही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्याची एकदिवसीय मालिका पहिल्या सामन्यानंतर अचानक रद्द करण्यात आली. तसेच २९ मार्चपासून सुरू होणारी, भारतातील सर्वात मोठी लीग स्पर्धा अशी ओळख असलेल्या आयपीएलच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. ही स्पर्धा आता १५ एप्रिलपासून सुरुवात होईल, असे बीसीसीआयने सांगितले आहे.