नवी दिल्ली - भारताची फुलराणी आणि आघाडीची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (बीपीएल) पाचव्या हंगामातून माघार घेतली आहे. सायनाने रविवारी ट्विटरवरुन ही माहिती दिली. पीबीएलचा पाचवा हंगाम पुढील वर्षी २० जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा -विराट सेनेचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान बळकट
'मी पीबीएलच्या पाचव्या हंगामात भाग घेणार नाही. मी यंदा दुखापतींशी झुंज देत आहे आणि चांगले तयार होण्यासाठी मला पीबीएल दरम्यान थोडा वेळ घ्यावासा वाटतो. यासाठी मी माझ्या सर्व चाहत्यांची दिलगिरी व्यक्त करू इच्छित आहे. पुढच्या वर्षी मी पीबीएलचा भाग होण्याची आशा आहे', असे सायनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाद्वारा (बीएआय) मान्यता प्राप्त आणि स्पोर्टस्लाइव्ह आयोजित या लीगमध्ये या वेळी दिल्ली, लखनऊ, बंगळुरू आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये सामने खेळवण्यात येणार आहेत. लीगसाठी खेळाडूंचा लिलाव २६ नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे होणार आहे.