राजकुमार हिरानी यांची दिग्दर्शनाची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. त्यांचा पहिला चित्रपट ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ने अनेक प्रथितयश दिग्दर्शकांना अवाक केले. त्यांची प्रसंगांची मांडणी अप्रतिम होती. या चित्रपटात शाहरुख खान ‘मुन्नाभाई’ च्या अवतारात दिसणार होता परंतु ती भूमिका संजय दत्तने साकारली. ती व्यक्तिरेखा संजयच्या पर्सनॅलिटीमध्ये इतकी फिट बसली की प्रेक्षक आता दुसऱ्या कुणालाही मुन्नाभाई म्हणून बघूच शकणार नाही. यात मोठा हात आहे राजकुमार हिरानी यांचा. त्यांच्या अफलातून प्रेझेंटेशनमुळे संजय दत्त आणि मुन्नाभाई अविभाज्य झाले. या चित्रपटापासून संजय दत्त आणि राजकुमार हिरानी यांच्यात घट्ट मैत्री झाली इतकी की हिराणींना संजय दत्तच्या आयुष्याबद्दल संपूर्णतः कळले.
त्यानंतर त्या दोघांनी मिळून ‘लगे रहो मुन्नाभाई’ बनविला आणि तोही तूफान चालला. हिराणींना संजय दत्त च्या आयुष्यातील नाट्य चित्रपटासाठी खुणावू लागले आणि त्यांनी संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा चित्रपट बनविला. जेव्हा हा चित्रपट बनवायचे ठरले तेव्हा संजय आणि राजू यांच्या संभाषणामधील बनविलेल्या नोंदी हजारेक पानांच्या झाल्या होत्या. त्यातून काही निवडक नाट्यप्रसंग घेऊन ‘संजू’ ची पटकथा बनविण्यात आली. रणबीर कपूर ला जेव्हा संजय दत्त च्या भूमिकेसाठी निवडले होते तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. परंतु जेव्हा ‘संजू’ चा ‘फर्स्ट लूक’ बाहेर आला तेव्हा सर्वचजण, फिल्म इंडस्ट्रीतलेसुद्धा, अवाक झाले होते. रणबीर ने भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि राजकुमार हिरानी यांचे ‘व्हिजन’ इतके जबरदस्त निघाले की रणबीर थेट संजूच दिसत होता.
जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज व्हायचा होता तेव्हा राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा यांनी आधी तो रणबीर चे वडील दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना दाखविला होता. आश्चर्य म्हणजे ऋषी कपूर ने आपल्या मुलाला ओळखलेच नाही इतका तो पडद्यावर संजय दत्त सारखा दिसत होता. ते खूप भावुकही झाले होते आणि बाजूला बसलेल्या पत्नीला, नीतू कपूर ला, सांगितले की त्याला हे सांगू नकोस की मी त्याची स्तुती करीत होतो. अजून त्याला बराच लांबचा पल्ला गाठायचाय. रणबीर कपूरला आपल्या वडिलांबद्दल नेहमीच आदरयुक्त भीती होती. परंतु यावरून कळले असेलच की रणबीर कपूर ने ’संजू’ साठी केलेले परिवर्तन किती पर्फेक्ट होते.